Balasaheb Thorat: शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असून, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. पक्षांतर बंदी कायद्याची अमलबजावणी होते का? त्याकडे कोर्टानं लक्ष द्यायला हवे, असे थोरात म्हणाले आहे. 


एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना थोरात म्हणाले की, जे काही घडत आहे, त्यानुसार न्यायालयाच्या निकालाकडे जनता जागृतपणे पाहत आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याची अमलबजावणी होते का? त्याकडे कोर्टानं लक्ष द्यायला हवे आहे. तसेच निर्णय होत असतांना कायद्याने आणि नियमाने निर्णय व्हावा असे आम्हाला वाटते, असेही थोरात म्हणाले. तर लोकशाहीत सत्ताबदल होत असतात, मात्र तो कसा झाला याचीही नोंद इतिहासात होते. जो बदल सद्या झाला आहे त्याची नोंद चांगली होणार नाही, हा वाईट इतिहास असेल असं थोरात म्हणाले. 


आम्हाला साथ देणाऱ्यांसोबत असणार...


तर पुढे बोलतांना थोरात म्हणाले सर, शिवसेनेचे 12 खासदार फुटले तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. आम्ही भाजपला विरोध करायला एकत्र आलो होतो. त्यामुळे जो कुणी आम्हाला यात साथ देईल त्यांच्या सोबत आम्ही असणार असल्याचे थोरात म्हणाले आहे. तर पक्ष, राजकारण म्हणजे मनाचे खेळ आहेत. त्यामुळे वाद असतील तर एकत्र बसून सोडवता येईल, अशा मनाचा मी आहे. तसेच राज्य घटनेला मूठमाती देण्याचं काम कुणी करत असेल तर त्यासाठी एकत्र येऊन लढाई करावी लागेल, असेही थोरात म्हणाले. 


नामांतर आमचा अजेंडा नाहीच...


औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या मुद्यावर बोलतांना थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या अजेंड्यावर शहराचे नामांतर नाही. किमान समान कार्यक्रमामध्येंही हा विषय नव्हता. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा करायला हवी होती. तसेच यापेक्षा दुष्काळ बाबतचर्चा करायला हवी होती, यापेक्षा विकास बाबत बोलायला हवे होते, शहराच्या पाण्याबाबत प्रश्न आहे.  हे शहर सुंदर असायला हवे, बाकी संभाजी महाराजांबद्दल आम्हाला आदर आहेच, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.