Maharashtra NCP Political Crisis : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना हाताशी धरत बंड केला. अजित पवार यांनी आज राजभवनात सरकारमध्ये सामील होत, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याशिवाय आणखी आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. अजित पवार यांना 37 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजतेय. पण राज्याच्या राजकारणात घडलेला आजचा हा महाभूकंप घडला कसा ? याची चर्चा सगळीकडेच सुरु आहे. त्याबाबत जाणून घेऊयात... 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून अजित दादा, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या चर्चा झाल्या आणि घडामोडी सुरु होत्या. यानंतर हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आणि काही इतर नेते ही या घडामोडींना वेग देण्यासाठी पुढे आले.  


इथे अजित पवार यांची तयारी सुरु असताना चार जून रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह, जेपी नड्डा यांची भेट घेतली.या भेटीत अजित पवार यांचा गटाला कसं सोबत घ्यायचं यावर रणनिती ठरवण्यात आली. यानंतर अजित पवार यांच्यासोबत आलेल्या वरिष्ठ नेत्यांनी स्वःता सोबत दोन-तीन आमदार सोबत आण्याचं सांगितले. यावर काम सुरु केलं गेलं आणि जेव्हा ही संख्या 30च्या पार गेली तेव्हा अजित दादांनी भाजपच्या केंद्रय नेतृत्वशी चर्चा सुरु केली. असे सांगितलं जातय की, अजित दादा यांनी जून महिन्यात दिल्लीत जाऊन अमित शाह यांची गुपचुप भेट घेतली आणि त्यानंतर राज्याच्या नेत्यांना पुढे चर्चा करण्यासाठी सांगितलं. 


त्यानुसार 22 जुन रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास्थानावर अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी भेट घेतली. एका लाल रंगाच्या मर्सिडीज हे तिघे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले. त्या रात्री जवळपास दोन तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि राज्य पातळीवर घडमोडींना वेग आला. 


अजित पवारांसोबत सगळं ठरल्यानंतर मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांनी रातोरात दिल्ली दौरा करुन अमित शाह, जेपी नड्डा यांना राज्याच्या राजकीय घडामोडीं बद्दल चर्चा केली. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार, शपथविधी समारंभावर शिक्कामोर्तब केलं गेलं. दिल्लीतून परतल्यानंतर सीएम, डीसीएम आणि अजित पवार यांच्यात अज्ञात स्थळी बैठक झाली, ज्यात अंतिम चर्चा पूर्ण केली गेली.