Maharashtra Monsoon News : शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात मान्सूनसाठी (Monsoon) पोषक वातावरण तयार होत आहे. कधी पाऊस येणार म्हणून राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पण लवकरच राज्यात मान्सून धडकणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. सध्या मान्सून गोवा, दक्षिण कर्नाटक, दक्षिण आंध्रप्रदेश पर्यंत पोहोचला आहे. मान्सून पुढे सरसावण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे.  


सध्या मान्सून कुठं?


मान्सून (Monsoon) त्याच्या सरासरी तारखेप्रमाणे गोवा, दक्षिण कर्नाटक, दक्षिण आंध्रप्रदेश पर्यंत पोहोचला आहे. मान्सून पुढे सरसावण्यासाठी अनुकूल वातावरण जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. सध्या राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व सरी कोसळत आहेत. यामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यात चांगला पाऊस कधी पडणार ? याकडं संपूर्ण शेतकऱ्याचं लक्ष लागलं आहे.       


महाराष्ट्रात मान्सून कधीपर्यंत पोहोचणार? Maharashtra Monsoon


हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जूनपर्यंत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग रत्नागिरी, पुणे दक्षिण, नगर दक्षिण, सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर जालना बीड धाराशिव लातूर पर्यंतच्या 12 जिल्ह्यात तसेच लगतच्या जिल्हा परिसरात मान्सून कधीही हजेरी लावण्याची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. तत्पूर्वी मान्सूनपूर्व जोरदार वळीव पावसाची दाट शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी सांगितली. महाराष्ट्रातील उर्वरित 24 जिल्ह्यात मान्सूनपूर्व वळीव पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. 


7 जूनपासून 17 जिल्ह्यात मध्यम तर 9 जूनपासून जोरदार पावसाची शक्यता 


पावसाची तीव्रता पाहता मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा 17 जिल्ह्यात 7 जूनपासून मध्यम तर 9 जूनपासून जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.  सध्या पडणारा पाऊस हा भाग बदलत पडणार पाऊस आहे. या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस होण्याची दाट शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. म्हणजेच जून महिन्यातच अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या होण्याची शक्यता या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, या काळात अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडत आहे. याचा शेती पिकांना देखील फटका बसत आहे. भाजीपाला पिकांसह फळबागांचं अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे. त्यामुळं काही ठिकाणी शेतकरी देखील चिंतेत आहेत.


महत्वाच्या बातम्या: