Maharashtra Live blog updates:बारामती पोटनिवडणुकीतील मतदानाचा फायनल आकडा समोर आला, किती टक्के मतदान झालं?
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

पार्श्वभूमी
Maharashtra Live blog updates: वाड्याच्या कोणसई येथील फटाका फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले या घटनास्थळाची आज शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या...More
मुंबईच्या औपनिवेशिक वारसा आणि साहित्यिक परंपरेला मोठा हातभार लागणार आहे. राज्य सरकारने सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट परिसरातील १४४ वर्षे जुन्या ‘डीन बंगल्या’च्या (किपलिंग बंगला) जतन आणि दुरुस्तीच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ९ कोटी ९५ लाख १८ हजार ७९९ रुपयांचा (जीएसटीसह) खर्च मंजूर करण्यात आला असून, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने २३ एप्रिल २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.
ग्रेड-२ वारसा दर्जा असलेला आणि राज्य संरक्षित स्मारक म्हणून ओळखला जाणारा हा बंगला मुंबईच्या कला आणि साहित्य इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार मानला जातो. सुमारे १८८२ च्या सुमारास उभारण्यात आलेल्या या बंगल्याची रचना औपनिवेशिक शैलीत असून, सागवान लाकडाच्या व्हरांड्या, आकर्षक बाल्कनी आणि लाकडी कोरीवकाम ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. २००७ पर्यंत या बंगल्यात शाळेच्या डीनचे अधिकृत निवासस्थान होते.
बीड मध्ये सलग दोन दिवस अझहर पठाण नामक कैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. यामध्ये पहिल्या रेकॉर्डिंग मध्ये तो वाल्मीक कराडच्या गॅंग कडून आपल्याला अमानुष मारहाण झाल्याचे सांगत आहे. तर दुसऱ्या रेकॉर्डिंग मध्ये वाल्मीक कराड यांना बदनाम करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, म्हणून मी तसं बोललो असं म्हणत आहे. यानंतर आता बीड कारागृहातच कैदी असलेल्या सनी आठवले याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. त्याने वाल्मीक कराडचा जेलमध्ये दबदबा आहे, तो अझहर पठाण वर दबाव आणत आहे, त्याला मारहाण झाली आहे, त्याचा खुबा उपसला आहे असे सांगत आहे. तर या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे अशी त्याने या कॉल रेकॉर्डिंग मधून मागणी केली आहे.
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा अद्याप बंद
खडकवासला ते पर्वती जलकेंद्रपर्यंतच्या मुख्य वाहिनीवर फ्लो मीटर बसवण्याचे काम करण्यास जागेवरील अडचणीमुळे कामाला ५-६ तास विलंब झाला.
आज दुपारी ३ वाजेपर्यंत काम संपेल. लष्कर, कोथरूड, औंध व नाना पेठ येथे दुपारी ३ पर्यंत पाणी पुरवठा होईल.
उर्वरीत जलकेंद्रात कालव्यातून पाणी उचलण्यात येत असून जलकेंद्रात येऊ लागल्याने १२ वाजल्यानंतर हळूहळू पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी आज सर्वसाधारण सभेत दिली.
पुणे शहरातील जलकेंद्र व पाईप लाईन वर फ्लो मीटर बसवण्याचे काम करण्यासाठी महापालिकेने गुरुवारी क्लोजर घेतला होता.
यावेळी ४५ स्वरूपाची कामे पूर्ण करण्यात आली. यापैकी खडकवासला ते पर्वती जलकेंद्रापर्यंतच्या २ हजार एम एम च्या लाइनवर फ्लो मीटर बसवण्याचे काम जागेवर अडचणी आल्याने ५- ६ तास विलंब होत आहे.
पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने पुणेकरांना काही प्रमाणात अडचण निर्माण झाली होती तर आज सर्व साधारण सभेत नगरसेवकानी ही प्रश्न उपस्थित केले
आमदार गायकवाड यांचं वक्तव्य जनता सहन करणार नाही
कोणाबद्दल काय बोलायचं हे त्यांना समजायला हवं
या संदर्भात सरकारला जी योग्य ती कारवाई लवकर करावी
या सरकारमध्ये काही गोष्टी लगेच होत नाहीत
आमदारकी रद्द करण्यासंदर्भात काय नियम आहेत हे मला माहीत नाही
मात्र ज्या तऱ्हेने त्यांनी वक्तव्य केलं ते बिलकुल योग्य नाही
संजय गायकवाड यांच्या वक्तव्याकडे जनताच आता लक्ष देईल
एनसीईआरटीच्या विरोधात साताऱ्यात आज जोरदार एल्गार पुकारण्यात आला. इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवल्याच्या निषेधार्थ छत्रपती घराण्याच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. साताऱ्यातील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली.मोर्चात मोठ्या संख्येने शिवप्रेमी, विविध संघटना आणि नागरिक सहभागी झाले होते. छत्रपती घराण्यातील वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा पार पडला.यावेळी बोलताना वृषालीराजे भोसले यांनी, मराठा साम्राज्याचा इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला. छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील शूरवीर सरदारांनी रक्त सांडून उभा केलेला इतिहास नकाशातून वगळण्यात आल्याची तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. तसेच, आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात पुन्हा नकाशाचा समावेश करावा, अन्यथा पुणे-मुंबईसह राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. पुढील पंधरा दिवसांत मागण्यांवर तोडगा न निघाल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा एल्गारही त्यांनी यावेळी पुकारला आहे...
भंडाऱ्याच्या पालांदूर येथील गोविंद विद्यालयच्या परिसरातील मौल्यवान वृक्षांची विनापरवाना कत्तल केल्याप्रकरणी प्रभारी मुख्याध्यापकावर वन विभागानं गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, ही झाडे स्मृतीप्रित्यर्थ लावण्यात आली होती. प्रभारी मुख्याध्यापक आनंदराव मदनकर या मुख्याध्यापकानं शाळेच्या आवारातील ८ मौल्यवान झाडे (६ सागवान, १ शिसम आणि १ लिंब) कोणतीही परवानगी न घेता तोडली आणि त्यांची बेकायदेशीर विक्री केली. महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ च्या कलम ३ व ४ अंतर्गत अड्याळ वन विभागात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा महिने उलटूनही ठोस कारवाई नं झाल्यानं तक्रारदारांनी आता वन विभाग कार्यालयासमोर उोषणाचा इशारा दिला आहे. या प्रकरणी आता वन विभाग पुढील तपास करत असून, संबंधित यंत्रसामग्री जप्त करण्याची मागणी होत आहे.
घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू
सोसायटी अध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी विरोधात गुन्हा दाखल
सोसायटीच्या आवारात बसवलेल्या लोखंडी घसरगुंडी डोक्यात पडून बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर मधील मगरपट्टा भागात घडली...
दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून सोसायटीतील अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अनिता नवनाथ देविकर असे मृत्यूमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरण
अशोक खरात प्रकरणी थोड्याच वेळात होणार सुनावणी
महिला अत्याचार प्रकरणी अशोक खरात याला vc द्वारे न्यायालयात हजर केले जाणार
धार्मिक विधीच्या बहाण्याने महिलावर अत्याचार करणाऱ्या भोंदू अशोक खरात याला महिला अत्याचार प्रकरणात 6 व्या गुन्ह्यात sit ने घेतले ताब्यात
आज अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची करण्यात येणार मागणी
बीडच्या विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊसतोड मजूर महिलांवर कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर बेड उपलब्ध नसल्याने अक्षरशः खाली झोपवून उपचार देण्यात येत आहेत. हा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. यामुळे ऊसतोड मजूर असलेल्या या रुग्णांची मोठी हेळसांड होत असल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान बेड उपलब्ध करून द्यावेत यासाठी आम्ही वरिष्ठांना कळविलेले आहे अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
यवतमाळच्या घाटंजी शहरात तीन अवैध सावकाराच्या घरावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा सावकाराचा निबंधक यांनी धाड टाकून संशयास्पद 7 कागदपत्रे जप्त करण्यात आली. वसंत नगर परिसरात सावकारी पथकाने प्रकाश अनंतराव खंदार व अन्य दोन जणांच्या राहत्या घरी अचानक झडती घेतली.
ही कारवाई प्रतिभा उज्ज्वल सोनटक्के व उज्ज्वल उमेशराव सोनटक्के यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. झडतीदरम्यान संबंधित घरातून एकूण 7 संशयास्पद कागदपत्रे, विविध सौदेपत्रे तसेच खरेदीखतांचा साठा जप्त करण्यात आला. या कागदपत्रांच्या आधारे अवैध सावकारीचे जाळे उघड होण्याची शक्यता आहे. जप्त केलेल्या सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी करून सावकारी (नियमन) अधिनियम अंतर्गत दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.
इंदिरानगर पाथर्डी फाटा परिसरात भीषण अपघात
हॉटेल एक्सप्रेस समोर घटना
सकाळी 6:30 वाजताची वेळ
एक्सप्रेस इन हॉटेल उड्डाण पुलावर अपघात
दारूने भरलेली क्रेटा कार अपघातग्रस्त
अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
गाडी मालकाचा तपास सुरू
गाडीत एवढ्या दारूच्या बाटल्या कोणाच्या आणि कशासाठी याचा शोध सुरू
स्थानिकांमध्ये खळबळ, पोलिस तपास सुरू
चारकोप पोलिस स्टेशन च्या अंतर्गत घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी यशस्वी छडा लावत 100 टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे.
परिमंडळ ११ अंतर्गत चारकोप पोलिसांची ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
१२ एप्रिल २०२६ रोजी कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरात एका घरात चोरीची घटना घडली होती. फिर्यादी महिलेच्या घरातून सुमारे २४० ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले होते.या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
तपासादरम्यान घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. तपासाची दिशा सातारा जिल्ह्याकडे वळली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने ४३ वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेले दागिने त्याने आपल्या नातेवाईकांच्या घरी लपवून ठेवले होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
जप्त मुद्देमाल:सुमारे ३४ लाख ८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यामध्ये मंगळसूत्र, बांगड्या, हार, कानातले अशा विविध दागिन्यांचा समावेश आहे.
तपासात पुढे आणखी एका ३६ वर्षीय महिलेचा सहभाग उघड झाला असून तिलाही पोलिसांनी अटक केली आहे.
अटक आरोपी: एक पुरुष (वय ४३, सातारा जिल्हा) आणि एक महिला (वय ३६, कांदिवली पश्चिम, मुंबई).
चारकोप पोलिसांच्या जलद आणि अचूक तपासामुळे या घरफोडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असून संपूर्ण मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर जवळच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील डी सेक्टरमधील ऑटोमेंट इंडस्ट्रीज कोटिंग कंपनीच्या सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून चौघांनी तब्बल ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हा सर्वप्रमार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून या घटनेमुळे उद्योजकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .या प्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील डी सेक्टरमध्ये उद्योजक संजय माणिकराव कुलकर्णी यांची रांजणगाव शेणपुंजी येथे ऑटोमंट इंडस्ट्रीज कोटिंग कंपनी आहे. नेहमीप्रमाणे सायंकाळी कंपनीत बंद झाल्यावर सुरक्षारक्षक उपस्थित होता. या कंपनीत मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता दरम्यान, कंपनीच्या गेटसमोर एका दुचाकीवर चौघेजण आले. त्यापैकी तिघांनी सुरक्षारक्षकाला मारहाण करून त्याचे हातपाय बांधले. त्यानंतर तिघांनी कंपाऊंडवॉलवरून उड्या मारून आत प्रवेश केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेणार
कोकणातील आंबा काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झालं आहे अजूनही सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही
त्याच अनुषंगाने राजू शेट्टी यांनी याआधी हर्षवर्धन सपकाळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती
सर्व विरोधी पक्षाने एकत्र येऊन या सगळ्या विरोधात आवाज उठवायला हवा यासाठी राजू शेट्टी विविध नेत्यांची भेट घेत आहेत
आज उद्धव ठाकरे यांची दुपारी एक वाजता मातोश्री येथे भेट घेतील
प्रतापगड घाटात भीषण अपघातात एका दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खोल दरीने आज एका दांपत्याचा जीव घेतला आहे. दुचाकी चालकाचा ताबा सुटल्याने मोटारसायकल कठड्याला धडकली आणि तब्बल ९०० फूट दरीत कोसळली.. या अपघातात मोहन चव्हाण आणि राजश्री चव्हाण, रा. वाई यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथक, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. मुसळधार पावसात आणि धोकादायक परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन राबवून मोहन चव्हाण यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.. मात्र राजश्री चव्हाण यांचा मृतदेह बाहेर काढता आला नाही..त्यामुळे घटनेमुळे प्रतापगड घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज पुन्हा सकाळपासून रेस्क्यू करण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे माहिती महाबळेश्वर ट्रेकर्स कडून मिळत आहे
KEM रुग्णालयाच्या नामांतराचा प्रस्ताव आरोग्य समितीत
आज होणाऱ्या आरोग्य समितीत काय निर्णय होणार याकडे लक्ष
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी KEM रुग्णालयाचे नाव “कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय” करण्याची केली होती मागणी
याबाबत पालिकेला पाठवलेल्या पत्रानंतर हा विषय समितीसमोर आला
यापूर्वीही नामांतराची मागणी होताच वाद निर्माण झाला होता
ब्रिटिशकालीन नाव असल्याने बदलाची शिफारस करण्यात आली आहे
जानेवारी २०२६ मधील कार्यक्रमातही लोढा यांनी ही मागणी केली होती
नामांतराच्या या प्रस्तावावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता असून, समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरामध्ये मंगळवारच्या रात्री कोयता गँगने एका मोमोजच्या दुकानावर चार लाख रुपयाचे खंडणीसाठी जीवघेणा हल्ला केला आहे. कोयता गॅंग मोमोजच्या दुकानावर हल्ला करत असतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. हल्लेखोरांनी मोमोजचे दुकानांमध्ये असलेल्या एका ग्राहकाची चार चाकी वाहनाची देखील तोडफोड करून मोठा आर्थिक नुकसान केला आहे. या प्रकरणात मोमोज च्या दुकानातील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सांगवी पोलिसांनी कोणत्या ने हल्ला करून खंडणी उकळणाऱ्या तिन्ही गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.
विरार : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गलगत शिरसाड परिसरात एका कंटेनर वाहनाचा अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली. या अपघातात कंटेनरने वसई-विरार शहर महानगरपालिकाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला जोरदार धडक दिल्याने ती फुटली आहे. परिणामी हजारो लिटर पाणी वाया जात असून परिसरात पाण्याचा प्रचंड अपव्यय होत आहे.
ही घटना रात्री उशिरा घडल्याची माहिती मिळत असून, अपघातानंतर लगेचच पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर पडू लागला. स्थानिक नागरिकांनी याची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
या दुर्घटनेमुळे वसई-विरार शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, महापौर आजीव पाटील यांनी सांगितले की, फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती युद्धपातळीवर हाती घेतली जाणार असून शक्य तितक्या लवकर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
भोंदू अशोक खरात याला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार
महिला अत्याचार प्रकरणातील सहाव्या गुन्ह्यात अशोक खरात याचा ताबा sit ने घेतला आहे
कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या कार्यालयात महिलाना द्रव्य प्यायला देऊन पेढा आणि इतर काहीतरी पदार्थ खाऊ घालून महिलांवर अत्याचार केल्याचा गुन्हा खरात वर दाखल आहे
याच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे
शिवाजी कोण होता या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत काल शिंदे गटाचे बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकालाच अर्वाच्य शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याच अनुषंगाने आज आणि उद्या बुलढाणा वंचित बहुजन आघाडी कडून बुलढाण्यात शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. या सामूहिक वाचनाच्या कार्यक्रमाला हजारो आंबेडकर अनुयायी व शिव प्रेमींनी उपस्थित रहावं अस आवाहन बुलढाणा वंचित चे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी केल आहे.
विरार : विरारच्या विराट नगर परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा बोळींज पोलीस ठाण्याच्या क्राईम युनिटने अवघ्या दोन दिवसांत केला आहे. या प्रकरणात शेजारच्या अल्पवयीन मुलासह तिघांना अटक करण्यात आली असून, चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
१३ एप्रिल रोजी एका इमारतीतील घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे १२ लाख ३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. तपासादरम्यान सहा महिन्यांपूर्वी हरवलेली घराची चावीच या गुन्ह्याचे कारण ठरल्याचे उघड झाले.
ही चावी शेजारच्या अल्पवयीन मुलाला सापडली होती. त्याने ती परत न करता स्वतःजवळ ठेवली. फिर्यादी बाहेरगावी गेल्याची संधी साधून त्याने आपल्या कॉलेजमधील मित्रांसह घराचे कुलूप उघडून चोरी केली. मौजमजा आणि महागड्या वस्तू घेण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक केली असून चोरीचे दागिने खरेदी करणारा लालू देवाभाई भरवाड यालाही ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
भांडुपच्या जनता मार्केट परिसरात एक निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून नऊ जण खाली कोसळल्याची घटना काल रात्री घडली आहे. या इमारतीच्या शेजारी एक लग्न सुरू होते. याठिकाणी आलेला एक व्यक्ती या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आला. तिथून तो खाली बेसमेंट मध्ये कोसळला. त्याला बाहेर काढायला गेलेले पाच आणखी लग्नात आलेले व्यक्ती आणि इथे काम करणारे तीन मजदूर ही खाली कोसळले. या नऊ ही जणांना अग्निशमन दलाने बाहेर काढले असून जवळील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.यात एकाची प्रकृती चिंताजनक असून बाकीच्यांची प्रकृती स्थिर आहे.
मिरा-भाईंदर परिसरात अमली पदार्थांविरोधात कारवाई करताना अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठे यश मिळवले आहे. भाईंदर रेल्वे स्टेशनजवळ कोकेनची विक्री करण्यासाठी आलेल्या एका विदेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सुमारे ४० ते ४५ लाख रुपये किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक नायजेरियन नागरिक अमली पदार्थ विक्रीसाठी भाईंदर स्टेशन परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ८७ ग्रॅम कोकेन आढळून आले.
जप्त करण्यात आलेल्या कोकेनची बाजारभाव किंमत अंदाजे ४० ते ४५ लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरोधात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयामार्फत २० ते २६ एप्रिल दरम्यान अमली पदार्थविरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अमली पदार्थांची विक्री, बाळगणे आणि सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून आक्रमक कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या कारवायांना वेग आला आहे.
बीड शहरातील सुभाष रोड परिसरात असलेल्या लेन्सकार्ट दुकानाला संतप्त सकल हिंदू संघटनेने टाळे ठोकून बॉयकॉट लेन्सकार्ट आशयाचा बॅनर लावला आहे. लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वरून तुम्हाला हिजाब चालतो मग टिकली का चालत नाही? असा सवाल आक्रमक झालेल्या हिंदू संघटनेच्या तरुणांनी उपस्थित केला. या लेन्सकार्ट दुकानातील हिंदू कामगाराच्या हाती दोरा बांधत ड्रेस कोडची नियमावली हटवली जावी अन्यथा दुकान उघडू देणार नाही असा पवित्रा बीड मधील हिंदू संघटनेने घेतलाय.
गोरेगावमधील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी आणि खगोलशास्त्रातील गुपिते उलगडण्यासाठी आमदार श्री. सुनीलजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली आज वीर सावरकर मैदान येथे ‘आकाश दर्शन व खगोलशास्त्र’ मार्गदर्शन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. युवा नगरसेवक अंकित प्रभू यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला गोरेगाव प्रभाग ५४ मधील इयत्ता ८ वी ते १० वीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या विशेष कार्यशाळेत आधुनिक आणि शक्तिशाली टेलिस्कोपद्वारे विद्यार्थ्यांना चंद्र, विविध ग्रह आणि नक्षत्रांचे प्रत्यक्ष दर्शन घडवण्यात आले. खगोलशास्त्र क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावेळी विद्यार्थ्यांना अंतराळातील घडामोडी, ताऱ्यांचे जीवनचक्र आणि या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान शिकता यावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या प्रसंगी बोलताना आयोजकांनी सांगितले की, "आजच्या धावपळीच्या युगात तंत्रज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालणे आवश्यक आहे. आपल्या भागातील विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे शास्त्रज्ञ दडलेले आहेत, त्यांना योग्य दिशा आणि संधी मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाबद्दलची कुतूहल जागृत करण्याचा आमचा प्रयत्न आहे."
कार्यशाळेदरम्यान ‘लेझर ट्रेनिंग’च्या माध्यमातून आकाश निरीक्षणाचे धडेही देण्यात आले. अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या विनामूल्य कार्यशाळेमुळे पालकांनी आणि शिक्षणप्रेमींनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे. या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, शिक्षक आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल बोलताना उपस्थितांनी नगरसेवक अंकित प्रभू यांच्या कल्पकतेचे विशेष कौतुक केले. केवळ राजकीय वारसा न जपता, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी अशा आधुनिक कार्यशाळांचे आयोजन करून त्यांनी एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे, अशा भावना यावेळी पालकांनी व्यक्त केल्या.
वाड्याच्या कोणसई येथील फटाका फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले या घटनास्थळाची आज शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भेट देत पाहणी केली . यावेळी नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली . या घटनेला तीन दिवस उलटले मात्र येथील पालकमंत्र्यांनी आजही या घटनास्थळाला भेट दिली नाही ही बाब अतिशय असंवेदनशील असून मी या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येत असताना आपण या ठिकाणी जाऊ नये असे मला काहींचे फोन आल्याने यात कुठेतरी पाणी मुरतंय असं सांगत गोऱ्हे यांनी गणेश नाईक यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद नेहमीच समोर आलेला पाहायला मिळत असतानाच नीलम गोऱ्हे यांनी देखील गणेश नाईक यांना लक्ष केल्याने आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog updates:बारामती पोटनिवडणुकीतील मतदानाचा फायनल आकडा समोर आला, किती टक्के मतदान झालं?