Maharashtra Legislative Council Election : लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा, अशोक चव्हाण या नेत्यांनी काँग्रेस सोडून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) विविध घटकांमध्ये प्रवेश केला. आता समाजवादी पक्षालाही मोठा फटका बसू शकतो का? अशी चर्चा रंगली आहे. सपा आमदार आणि माजी राज्यसभा खासदार अबू असीम आझम यांची आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाल्याची चर्चा आहे. दोघांमध्ये या भेटीत एक तास चर्चा झाल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार फुटण्याची चर्चा असतानाच आता अजित पवारांनी दोन आमदार गळाला लावल्याची चर्चा आहे. अबू आझमी यांच्यासह रईस शेख सुद्धा आमदार आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. 


महाविकास आघाडीला धक्का बसू शकतो?


समाजवादी पक्ष आणि AIMIM यांचा पाठिंबा विधानपरिषद निवडणुकीत महत्त्वपूर्ण असणार आहे. या दोन्ही पक्षांचे 3 आमदार आहेत. त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास त्यांच्या विजयाची शक्यता वाढणार आहे. मात्र, एआयएमआयएमने अद्याप आपली रणनीती स्पष्ट केलेली नाही. दुसरीकडे, अबू आझमी आणि रईस शेख अजित पवारांच्या गळाला गेल्यास तिसऱ्या जागेवर विजयाचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला धक्का बसू शकतो.  


अजित पवार गटाचे आमदार माझ्या संपर्कात नाहीत


दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार माझ्या संपर्कात नाहीत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असले तर काही माहीत नाही, अशी गुगली दोन दिवसांपूर्वी  शरद पवार यांनी टाकली होती. शरद पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, शासनामार्फत करण्यात येणारी विकासकामे व योजनांची अंमलबजावणी अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार केली जाते.


अबू आझमींकडून प्रफुल पटेलांची सुद्धा भेट 


दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत अबू आझमी यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांच्या बैठकीत अबू यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती समोर आली होती. दुसरीकडे, आझमी यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले होते. 


कोण आहेत अबू आझमी?


विशेष म्हणजे अबू असीम आझमी हे मुंबईतील मुस्लिमबहुलमानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आझमी हे प्रदीर्घ काळ महाराष्ट्र सपाचे अध्यक्ष होते. हा मतदारसंघ मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात येतो.  अबू आझमी मूळचे उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील मंजिरपट्टी गावचे आहेत. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात आझमींचे नाव समोर आले होते आणि या प्रकरणात त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. त्यानंतर आझमी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.


इतर महत्वाच्या बातम्या