Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटकातून (Karnataka) महाराष्ट्रात (Maharashtra) बस सेवा पुन्हा सुरु झाली आहे. बेळगावहून (Belgaon) कर्नाटक सरकारची बस पुण्याला (Pune) रवाना झाली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border) चिघळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यातील बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. अखेर आज कर्नाटक सरकारची बेळगाव-पुणे ही बस रवाना झाली आहे.


ही बस बेळगावहून निघाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर शहरात जाणार नाही. कोल्हापूर बायपासमार्गे पुढे सातारा आणि मग पुण्याकडे रवाना होणार आहे. "आता वातावरण निवळलं आहे," असं प्रवाशांचं म्हणणं आहे. "तर मराठी आणि कन्नड काही वाद नाही. हा वाद राजकीयदृष्ट्या घडवून आणलेला आहे," अशी प्रतिक्रिया बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने दिली.  या वादामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचं आणखी एका प्रवाशाने म्हटलं आहे. 


...म्हणून बससेवा तात्पुरती बंद
कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यावर आपला दावा सांगितल्याने त्याला महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं. तेव्हापासून दोन्ही राज्यातील वातावरण तापलं आहे. यानंतर कर्नाटकच्या बसला दौंड इथे शाई फासण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राच्या बसला कलबुर्गी इथे काळे फासण्यात आले. या साऱ्यांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद केली होती. कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांनी बस सेवा बंद केल्याने नोकरी, उद्योगाच्या निमित्ताने कर्नाटक आणि महाराष्ट्रात दररोज ये जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. अखेर आज बेळगावहून पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.


हिरेबागवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक
सीमावाद चिघळलेला असतानाच कन्नड संघटनांनी 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली होती. हिरेबागवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. त्याशिवाय, महाराष्ट्राच्या ट्रकला शाईदेखील फासण्यात आली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन निषेध व्यक्त केला. यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं. तसंच महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असंही म्हटलं.


Section 144 in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी, 15 दिवसांसाठी आदेश लागू