मुंबई :  राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार का याचा आज निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक होत असून निर्बंधाबाबत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 


राज्यात लागू असलेल्या निर्बंधामध्ये काही शिथिलता आणली पाहिजे यासाठी आम्ही अहवाल सादर केला आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की,  राज्याचे अर्थचक्र चाललं पाहिजे यासाठी शिथिलता गरजेची आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु करता येतील पण एसीचा वापर नसावा. दुसरीकडे रेस्टॉरंट, सलून पार्लर हळूहळू जास्त संख्येने सुरु करता येतील. शनिवार आणि रविवार पैकी आता शनिवारी संध्याकाळी सर्व व्यवहार सुरु ठेवता येऊ शकेल.


दोन डोस झालेल्यांना रेल्वेनं प्रवास करता येऊ शकतं का याची चाचपणी सुरु आहे, पण तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ॲागस्ट पर्यंत थांबता येईल का यावरही विचार सुरु असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. 


राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 11 जिल्हे नेट सरासरी पेक्षा अधिक असल्याने तेथील कोणतेही निर्बंध शिथिल केले जाणार नाही. मात्र इतर जिल्ह्यात जे निर्बंध लेव्हल 3 चे आहेत. त्यांच्यासंदर्भात आरोग्य विभागामार्फत सूचना मुख्यमंत्र्याना केल्या आहेत. मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. इतर 25 जिल्ह्यात जिथे रुग्णदर कमी आहे, त्यासंदर्भात काही निर्णय होतील, असंही राजेश टोपे यांनी काल स्पष्ट केलं होतं. 


जगात अनेक देशात तिसरी लाट सुरु आहे. लसीकरण झालं असल्यानं मृत्यूदर कमी आहे. लसीकरण वेगाने होत आहे. अर्थचक्रही चाललं पाहिजे त्यामुळे निर्बंध शिथील होतील. राज्य तिसऱ्या लाटेसाठी तयार आहे. तिसरी लाट येऊ नये असं वाटतंय, पण आलीच तर सरकारने मुबलक तयारी करुन ठेवली आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.


महत्वाच्या बातम्या :