Maharashtra Gram Panchayat Election 2022 : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली आहे. आयोगानं याबाबतचं परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन 1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3) मधील कलम 10 अ पोटकलम (4) मधील अधिकारांचा वापर करत राज्य निवडणूक आयोगानं 271 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. पाच जुलै रोजी आचारसंहिता लागू होणार आहे. चार ऑगस्ट रोजी मतदान, तर पाच ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. यामुळे पुढील महिना या ग्रामपंचायत हद्दीत रणधुमाळी गाजणार आहे. राज्यात 28,813 ग्रामपंचायती आहेत. 


निवडणुका असलेल्या ग्रामपंयचायतीमध्ये, निवडणूक क्रायक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहिल, असे जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात यावी, असेही निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेय. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल.या निवडणुकीदरम्यान कोरोना नियमांचं पालन करण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे. 



  • कसा आहे निवडणूक कार्यक्रम - 
    तहसिलदार यांनी निवडणूक नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक - 5 जुलै 2022 (मंगळवार ).
    नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ - 12 जुलै 2022 ते 19 जुलै 2022 पर्यंत... वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. 
    नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक - 20 जुलै 2022.
    नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक - 22 जुलै 2022.
    निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदरांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक - 22 जुलै 2022 (दुपारी तीन नंतर).
    आवश्यक असल्यास मतदानाचा दिंनाक - 4 ऑगस्ट 2022.
    मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक - 5 ऑगस्ट 2022.



कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतीच्या निवडणुका - 
नाशिक - 40
धुळे - 52
जळगाव - 24
अहमदनगर - 15
पुणे - 19
सोलापूर - 25
सातारा - 10
सांगली - 1
औरंगाबाद 16
जालना - 28
बीड - 13
लातूर -9
उस्मनाबाद - 11
परभणी - 3
बुलढाणा - 5


62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीमध्ये उडणार 'धुराळा'