कल्याण : कल्याणमध्ये वृक्ष लागवडीच्या मोहिमेचा शुभारंभ होत आहे. यंदा राज्य सरकारने 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. कल्याण तालुक्यातील वरपा गावात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.


राज्यभरात ठिकठिकाणी 'वन महोत्सव' साजरा केला जात आहे. राज्य सरकारच्या वतीने या महोत्सवात विविध कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. मागील वर्षी राज्यभरात एक कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला होता. मात्र यंदा तब्बल 13 कोटी वृक्षलागवड करण्याचा सरकारचा मानस आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. तर चित्रपट निर्माते सुभाष घई देखील सहभागी झाले.




कोकणातही वृक्ष लागवडीचा संकल्प

13 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत कोकणातील वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. रत्नागिरी जवळच्या आरेवारे या समुद्र किनारी करण्यात आला वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्याला या वर्षी 20 लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यातील सहा लक्ष वृक्ष वन विभागातर्फे लावण्यात येणार असून उर्वरित झाडे अन्य यंत्रणांच्या माध्यमातून लावण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात वृक्ष लागवड करताना कोकणातील पारंपरिक वृक्षांची लागवड कशी होईल यावर भर देण्यात येणार आहे .