मुंबई : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला, आता 11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे डिटेल वेळापत्रक आज जाहीर केले जाऊ शकते. शिवाय सीईटी परीक्षेची नोंदणी आणि परीक्षेची तारीख सुद्धा आज जाहीर होण्याची शक्यता आहे. 10 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सीईटी परिक्षेची आता वाट पाहत आहेत.


नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. अंतर्गत मूल्यपामनद्वारे लागलेल्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना 90 टक्के, 100 टक्के गुण मिळाले. मात्र, इतके गुण मिळून सुद्धा विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच अकरावी सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे दहावी मध्ये चांगले गुण मिळाले म्हणून हुरळून न जाता सीईटी परीक्षेत सुद्धा चांगले गुण मिळवण्यासाठीची तयारी करावी लागणार आहे.  यावर्षी पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यपामनद्वारे लागलाय. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना 90 टक्के टक्केच्या वरती गुण मिळालेत. मात्र, हे गुण मिळून सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे नामांकित कॉलेज मिळणार नाहीये. कारण तुम्हला यंदाच्या वर्षी नामांकित कॉलेज मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर अकरावी सीईटी परीक्षेत सुद्धा तुम्हाला चांगले गुण मिळवावे लागणार आहेत. कारण त्या गुणांच्या आधारेच मेरिट लिस्ट नुसार नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे.


अशी असणार प्रक्रिया
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी 23 ऑगस्टपर्यंत स्वतंत्र सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध होणार आहे, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितलं आहे.  विद्यार्थ्यांना सीईटीसाठी अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळामार्फत मंडळाच्याच संकेतस्थळावर यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक टाकून सीईटीपरीक्षेचा अर्ज ओपन करता येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावीच्या निकालाचे गुण अपडेट केलेले असतील. ‘सीईटी परीक्षा देण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का’ आणि सीईटी परीक्षा देण्यासाठी तुम्ही इच्छुक नाही’ असे दोन पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील. त्यातील पर्याय निवडून विद्यार्थ्यांना पुढील अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा विनामूल्य असेल, मात्र अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क आकारण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले होते.
 
यावर्षी दहावीच्या निकालावर नजर, 100 टक्के घेणारे 957 विद्यार्थी
राज्यात 100 टक्के घेणारे 957 विद्यार्थी आहेत
90 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे 1,04,633 विद्यार्थी आहेत
85 ते 90 टक्के दरम्यान गुण घेणारे 1,28,174 विद्यार्थी आहेत
80 ते 95 टक्के दरम्यान गुण घेणारे 1,85,542 विद्यार्थी आहेत


आता कशी असेल ही सीईटी परीक्षा यावर सुद्धा नजर टाकूया 


राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर 100 गुणांची ओएमआर पद्धतीने ऑफलाइन ही परीक्षा घेतली जाणार आहे


यासाठी विद्यार्थ्यांना 2 तासांचा वेळ दिला जाणार आहे


गणित विज्ञान इंग्रजी सामाजिक शास्त्र या विषयांचे प्रत्येकी पंचवीस गुण या शंभर गुणांच्या परीक्षेत समाविष्ट असतील


ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या परीक्षेचे नियोजन बोर्डाकडून केले जातंय.