Maharashtra Budget : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.9 टक्के दराने वाढणार; दरडोई उत्पन्न 3.47 लाखांवर, आर्थिक पाहणी अहवालातून समोर
Maharashtra Economic Survey : राज्याचे दरडोई उत्पन्न 3.47 लाख रुपये असून देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा 14 टक्के इतका सर्वाधिक वाटा असल्याचं आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलं आहे.

मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षात ती 7.9 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-26’ अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संतुलित वाढ, पायाभूत सुविधांमध्ये वाढलेली गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणा यामुळे राज्याची आर्थिक स्पर्धात्मकता अधिक बळकट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल विधानसभेत वित्त व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी तर विधानपरिषदेत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सादर केला.
Maharashtra GDP Share : देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा
आर्थिक पाहणी अहवालानुसार, 2025-26 मध्ये राज्याचे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न 51,00,597 कोटी रुपये अपेक्षित आहे, तर वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न 28,82,699 कोटी रुपये इतके राहण्याचा अंदाज आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न 3,47,903 रुपये अपेक्षित असून ते अखिल भारताच्या दरडोई उत्पन्नाच्या (2,19,575 रुपये) तुलनेत लक्षणीय जास्त आहे. पहिल्या सुधारित अंदाजानुसार 2024-25 मध्ये देशाच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 14 टक्के असून तो देशातील सर्वाधिक आहे.
Sector Growth : कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील वाढ
सन 2024-25 मध्ये विविध क्षेत्रांत वाढ अपेक्षित आहे. कृषी व संलग्न क्षेत्रात 3.4 टक्के वाढ अपेक्षित आहे, तर उद्योग क्षेत्रात 5.7 टक्के आणि सेवा क्षेत्रात 9.0 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. सेवा क्षेत्रातील वेगवान वाढ राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार देत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Inflation Control : राज्यात चलनवाढ नियंत्रणात
एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत ग्रामीण भागातील सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक 401.8 तर नागरी भागातील 376.7 इतका होता. या काळात ग्रामीण भागात 2.0 टक्के आणि नागरी भागात १.५ टक्के चलनवाढ नोंदविण्यात आली. जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दरातील सुधारणांमुळे किमतींवर सकारात्मक परिणाम झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Public Distribution System : सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा विस्तार
डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात 270.84 लाख शिधापत्रिका धारक असून 51.636 रास्त भाव दुकाने कार्यरत आहेत. ‘शिवभोजन’ योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2025 पर्यंत 4.09 कोटी शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.
Social Development : सामाजिक विकासातही प्रगती
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागरी भागात 8.75 लाख तर ग्रामीण भागात 16.04 लाख घरे पूर्ण झाली आहेत. जल जीवन अभियानामुळे 90 टक्क्यांहून अधिक कुटुंबांना नळजोडणी उपलब्ध झाली आहे.
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील ४०,२४७ गावांपैकी ३४,५८४ गावे ओडीएफ+ घोषित करण्यात आली आहेत. नागरी भागात डिसेंबर २०२५ पर्यंत ४२ शहरे ओडीएफ, ८२ शहरे ओडीएफ+, २५७ शहरे ओडीएफ++ आणि ३० शहरे वॉटर+ घोषित झाली आहेत.
Agriculture Update : कृषी क्षेत्रातील स्थिती
२०२५ च्या मान्सूनमध्ये राज्यात सरासरीपेक्षा १०९.१ टक्के पाऊस पडला. खरीप हंगामात १५७.२७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. तृणधान्ये, ऊस आणि कापूस उत्पादनात वाढ अपेक्षित असली तरी कडधान्ये आणि तेलबिया उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ११६.४० लाख शेतकऱ्यांना ९४.८२ लाख हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ९,०२२.३८ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. सौर कृषी पंप योजनेंतर्गत डिसेंबर २०२५ अखेर ७.३७ लाख सौर पंप बसविण्यात आले आहेत.
Investment and MSME : उद्योग आणि गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर
‘महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५’ अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यात आली आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत ६३.८५ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी झाली असून त्यातून २.५२ कोटींहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत.
देशातील थेट परकीय गुंतवणुकीत ३१ टक्के वाट्यासह महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. तसेच स्टार्टअप्सच्या संख्येतही राज्याचा देशात सर्वाधिक १७ टक्के हिस्सा आहे.
Infrastructure and Energy : ऊर्जा व पायाभूत सुविधांमध्ये वाढ
३१ मार्च २०२५ रोजी राज्यातील वीज निर्मितीची स्थापित क्षमता ४१,०१९ मेगावॅट होती. नवीकरणीय ऊर्जेच्या उत्पादनात वाढ होत असून या क्षेत्रात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मार्च २०२५ अखेर राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी ३.४५ लाख किलोमीटर झाली आहे. १ जानेवारी २०२६ रोजी राज्यात ५२८ लाख वाहने नोंदणीकृत होती.
मुंबई–नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जून २०२५ पासून पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तसेच मुंबई मेट्रो लाईन-३ (कुलाबा–वांद्रे–सीप्झ) ऑक्टोबर २०२५ पासून पूर्णपणे सुरू झाली असून दररोज सरासरी ७८ हजारांहून अधिक प्रवासी या मार्गाचा वापर करत आहेत.
Tourism Growth : पर्यटन आणि कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ
भारत पर्यटन डेटा कंपेंडियमच्या माहितीनुसार २०२४ मध्ये परदेशी पर्यटक भेटींमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच डिसेंबर २०२५ पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या





















