मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत  (Corona Update) चढ उतार होत असल्याचे चित्र असून  आज राज्यात केवळ 113  रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील  ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील  एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 714 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 41 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 127 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात आज  चार कोरोना रुग्णांचा मृत्यू


राज्यात आज चार कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,26, 790  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 97, 31, 899   प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


राज्यात सध्या  714 अॅक्टिव्ह रुग्ण 


राज्यात सध्या 714 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 309 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 38 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.


देशात 24 तासांत नवीन 796 कोरोना रुग्णांची नोंद


आज देशात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र मृत्यूची संख्या वाढलेली दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 796 नवीन रुग्ण आढळले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाचे  929 नवीन रुग्णांची नोंद आणि सहा जणांचा मृत्यू झाला होता. जाणून घ्या देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजार 889 इतकी झाली आहे. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख  21 हजार 710 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 4 हजार 329 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.20 टक्के आहे.