मुंबई : लोकशाहीत बहुमताला महत्व असतं. शिवसेना ( Shiv Sena ) हे नाव आणि चिन्ह दोन्ही आम्हाला मिळालं. खऱ्या अर्थानं आज सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. या निकालाच्या माध्यामातून निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी आज सत्याचा विजय झाल्याचे म्हटले आहे.
"आजचा हा विजय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि लोकशाहीचा आहे. याबरोबरच हा विजय सत्याचा आहे. आम्ही संघर्ष केला, आजचा विजय म्हणजे त्यातंच प्रतिक आहे , असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आजचा विजय म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे. याबरोबरच लाखो शिवसैनिकांचा आहे. आजच्या निर्णयाने आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झालं आहे. या देशात राज्य घटनेनुसार कायदा चालतो. निवडणूक आयोगाचा निर्णय हा मेरीटवर दिलेला निर्णय आहे. विरोधकांच्या टीकेवर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही," असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर शिंदे गाटाचे कार्यकर्ते राज्यभर जल्लोष करत आहेत. ठिकठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या