Budget Session : अर्थसंकल्पात काय काय असणार? AI चा वापर कसा? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय? महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी मांडली अधिवेशनाची रुपरेषा
Maharashtra Budget Session : निवडणुकीवेळी ज्या घोषणा महायुती सरकारने केल्या होत्या त्या घोषणा आम्ही पूर्ण करू असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.

मुंबई : विरोधकांनी नुसते हवेत गोळीबार करणे आणि पळून जाणं हे योग्य नाही. विरोधकांनी अधिवेशनात त्यांच्या मनात शंका असलेले सगळे प्रश्न मांडावेत, त्याला सविस्तर उत्तर आम्ही देऊ. विरोधी पक्षांना भरपूर चर्चेची संधी देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर अजितदादांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी काम करू असं उममुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. तर निवडणुकीच्या वेळी ज्या घोषणा करण्यात आल्या होत्या त्या पूर्ण करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वीच्या पत्रकार परिषदेत महायुती सरकारकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अजितदादांनी आर्थिक शिस्त कधीही मोडली नाही, त्यांचे कार्य पुढे नेऊ असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
Devendra Fadnavis PC : काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
या अधिवेशनाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या प्रश्नांची सोडवणूक आम्ही करू. देशातील सर्वाधिक दिवस अधिवेशन हे महाराष्ट्रात होतं. अजित पवारांनी या अर्थसंकल्पाची चांगली तयारी केली होती. पण दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत. कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्धास्तपणे अर्थखातं ज्या व्यक्तीला देता येईल असं व्यक्तिमत्व अजितदादा होते. अर्थखात्याची शिस्त ते पाळायचे आणि कुठलाही बेशिस्तपणा ते चालू द्यायचे नाहीत. आर्थिक शिस्तीत बसत नसेल तर ते स्पष्टपणे सांगायचे. पण जिथे आवश्यक असेल तिथे मार्गदेखील काढायचे.
सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच अधिवेशनाला सामोरं जात आहेत. अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. दादांप्रमाणे त्या ठामपणे या अधिवेशनाला सामोरं जातील असा विश्वास आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीमध्ये 20 हजार कोटींची वाढ झाली आहे. तर महाराष्ट्राला 98,300 कोटी रुपयांचा कर परतावा मिळणार आहे. दावोसमध्ये 30 लाख कोटींचे करार करण्यात आले. त्याची काय वस्तुस्थिती आहे याचे सविस्तर विवेंचन या अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे.
महाविस्तार या नावाचं एक एआय अॅप तयार करण्यात आलं असून प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. पिकाचा फोटो काढला तरी ते अॅप शेतकऱ्याला त्याच्या पिकाची अवस्था काय आहे याची माहिती मिळणार आहे.
विरोधकांचं एक सहा पानाचं आणि 18 मुद्द्यांचं पत्र आम्हाला मिळालं. जागतिक मातृभाषा दिनी आपल्या मातृभाषेच्या एवढ्या चुका या पत्रात करण्यात आल्या आहेत. बातम्यामध्ये आलेले पॅरा आहे तसे यामध्ये टाकण्यात आले आहेत, जराही बदल करण्याची तसदी त्यांनी घेतली नाही.
Sunetra Pawar PC : काय म्हटलं सुनेत्रा पवारांनी?
यंदाचे अधिवेशन हे महायुती सरकारचं दुसरं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. महायुतीला लोकांनी सत्ता दिली, त्या विश्वासाला न्याय देण्याचं काम आमचं सरकार करेल. दिवंगत अजितदादांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे.
विकासाच्या बाबतील दादांनी कधीही तडजोड केली नाही. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा दादांचा संकल्प होता. त्यावर आता महायुती सरकार काम करेल. लाडकी बहीण योजना बंद होईल असे आरोप होत असताना दादांनी त्यासाठी तरतूद केली आणि ही योजना कायम सुरू राहील याची काळजी घेतली.
Eknath Shinde PC : एकनाथ शिंदे काय म्हणाले?
अर्थसंकल्प मांडायचा म्हटल्यावर सर्वांचं लक्ष अजितदादांकडे लागलेलं असायचं. आज ते आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या दुःखाचं सावट या अर्थसंकल्पावर आहे. नियतीसमोर आपलं काही चालत नाही.
विकासाची घडी कशी बसवायची आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील आपल्या सहकाऱ्यांना आर्थिक बाबींबद्दल अजितदादा स्पष्टपणे सांगायचे. त्यांचे स्वप्न आता आपल्याला पूर्ण करायचं आहे.
देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या अर्थव्यवस्थेची नाडी माहिती आहे. सर्वसामान्याचं सरकार म्हणून साडेतीन वर्षे आम्ही काम केलं. या काळात अनेक योजना आम्ही सुरू केल्या. दावोसमध्ये 30 लाक कोटींचे करार केले. त्या माध्यमातून 40 ते 50 लाख लोकांना रोजगार मिळणार असून राज्य प्रगतीपथावर जाण्यास मदत होईल. निवडणुकीच्या वेळी ज्या ज्या घोषणा आम्ही केल्या त्या घोषणा योग्य वेळी पूर्ण करू.
विरोधकांमध्ये संवादाचा अभाव असून त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी भांडणं गरजेचं आहे. त्यांनी आमच्याकडून लोकांची कामं करून घेणं अपेक्षित आहे, पण तसं ते काही करत नाहीत.
ही बातमी वाचा :
























