Maharashtra Budget Session 2022 : विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस राज्यपालांनी अभिभाषण दीड मिनिटांत गुंडाळल्यानं गाजला. तर आज दुसऱ्या दिवशी ओबीसी आरक्षण (OBC Reservation) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी या दोन मुद्यांवरून गाजण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला पुन्हा एकदा धक्का बसल्यानं भाजपकडून ठाकरे सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. पण या मुद्यावरून आक्रमक होताना आमदारांचं निलंबन होणार नाही याची काळजी घ्यावी असा कानमंत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. 


पावसाळी अधिवेशनात ओबीसींच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या भाजपच्या 12 आमदारांवर गैरवर्तनाचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी काल (गुरुवारी) भाजप आणि मित्रपक्षांच्या आमदारांचं स्नेहभोजन आयोजित केलं होतं. त्यावेळी फडणवीस यांनी आमदारांसमोर रणनीती स्पष्ट केली होती. 


आजच्या दुसऱ्या दिवशी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या मुद्द्यांवर प्रत्त्युर देण्यासाठी भाजप नेते किरीट सौमय्या आणि केंद्रीय पथकांच्या वापरासह केंद्रातील घडामोडींवर सत्ताधारी विरोधकांना कोंडीत पकडण्याच्या तयारीत असणार आहेत. तर राज्यातील वीजेचा प्रश्न, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन यासह विविध मुद्यांवर विरोधकही सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सर्वात महत्वाची बाब ठरणार आहे. ती म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही याच अधिवेशनात निवडणूक होणार असं वक्तव्य केलं होतं. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही आवाजी पद्धतीनं व्हावी यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ झाला होता. त्यामुळे या अधिवेशनात ही निवडणूक होणार का? आणि कशी होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


दरम्यान, कालपासून सुरु झालेलं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. 


राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनेक घडामोडी घडत गेल्या आहेत. यावरूनच विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपलेली दिसत आहे. याच घडामोडींदरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार आहे. महाविकास आघाडी सरकारचं हे तिसरं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात राजकीय आखाडा, हे मुद्दे चर्चेत 


राज्यपालांचे दीड मिनिटांचे अभिभाषण अन् गोंधळ


राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांच्या संबंधित तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या संबंधित केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे राज्यपालांना आपलं भाषण दीड मिनिटात आवरावं लागलं.


राज्यपालांनी सभागृह सोडलं


राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान सत्ताधाऱ्यांनीच घोषणाबाजी केल्याने राज्यपालांनी अभिभाषण आटोपतं घेतलं. अवघ्या दीड मिनिटात राज्यपालांनी आपले भाषण आटोपतं घेत पटलावर ठेवले आणि त्यांना सभागृह सोडावं लागलं.


राज्यपालांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी


राज्यपालांनी शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंच्या संबंधित केलेल्या वक्तव्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीनं राज्यपालांच्या विरोधात सभागृहाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. विधानपरिषदेचे आमदार संजय दौंड यांनी राज्यपालांच्या वक्तव्यांचा निषेध करत विधानभवनाच्या पायऱ्यांवर शीर्षासन केलं.


नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक


राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली. मंत्री जेलमध्ये आहे आणि राजीनामा झाला नाही असं पहिल्यांदा घडत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.  देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, हसिना पारकरला पैसे दिले आहेत, त्यातून नवाब मलिकांना अटक झाली आहे. हसिना पारकर ही दाऊदची बहीण आहे. दाऊदच्या बहिणीला पैसे देणे म्हणजे दाऊदला मदत करण्यासारखे आहे. दाऊदला समर्थन करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.