Maharashtra Budget 2026 :   राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत ही कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात, त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणाही केली आहे. या कर्जमाफीच्या मुद्यावर स्वाभिमानी शेतकरी संगटनेनं टीका केली आहे. कर्जमाफी योजना ही फसवी आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी टीका केली आहे.

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले संदीप जगताप?

कर्जमाफी योजना फसवी आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच.अटी शर्ती घालून दिलेली कर्जमाफी शेतकरी हिताची नाही असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी कर्जमाफी योजनेवर टीका केली. राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची घोषणा केली आहे. मात्र, ही घोषणा फसवी असल्याचे संदीप जगताप म्हणाले. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, अशा घोषणा सरकारने केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अटी शर्ती घालून केवळ 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. ती ही 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची. यामुळं शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच नाही असेही जगताप म्हणाले.

शेतकऱ्यांनी जनावरे विकून कर्ज फेडले, सरसकट कर्जमाफी करणे गरजेचं, शेतकरी कामगार पक्षाची मागणी

राज्य सरकारनं केलेली कर्जमाफी दुर्दैवी असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने म्हंटलं आहे. शेतकऱ्यांनी जनावरे विकून कर्ज फेडलेले आहे, म्हणून सरसकट कर्जमाफी अपेक्षित होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्यामुळं महाराष्ट्राचा मसनवाटा झाला असताना शेतकरी अशा घोषणा करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार असतील तर हे निंदनीय आहे. या कर्जमाफी विरोधात आम्ही शेतकऱ्यांसोबत आंदोलन उभं करणार आहोत. सरकारला द्यायचे असेल तर सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. 

Continues below advertisement

राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला : राजू शेट्टी

शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही तकलादू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संगटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. ऑक्टोबर महिन्यात आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. बहुतांश शेतकऱ्यांची पीक कर्जे ही साडेतीन ते चार लाख इतकी आहेत. दोन लाखांच्या वरची रक्कम भरल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल