अहमदनगर : मराठा समाजाला (Maratha Resrvation) आरक्षण मिळावं यासाठी राज्यभर आंदोलनं झाली. हे सगळं ताजं असताना आता धनगर समाजही (Dhangar Reservation) आरक्षणासाठी आक्रमक झालाय. अहमदनगरच्या चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीनं धनगर समाजाला एसटी संवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरु केलंय. दरम्यान या आंदोलनावेळी अण्णासाहेब रुपनवर हे उपोषणाला बसलेत.. मात्र उपोषणाला बसल्यानंतर त्यांची तब्ब्येत बिघडल्यानं त्यांना सुरुवातीला अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आता त्यांची प्रकृती आणखी बिघडल्यानं त्यांना पुण्याला हलविण्यात आलंय. 


गिरीश महाजनांनी दिलेल्या आश्वासनाची  काल मुदत संपली


अहमदनगरच्या चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावं या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा पंधरवा दिवस आहे. दरम्यान या आंदोलकांची मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली होती आणि दोन दिवसात याबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. त्याची मुदत काल संपली आहे...चौंडीतील आंदोलन हे अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे हे आंदोलन आता काय स्वरुप धारण करणार हे ही पहाणं महत्त्वाचं असणार आहे.


आंदोलनाची शासनाने तात्काळ दाखल घेऊन मार्ग काढावा


 धनगर समाजाला तातडीने अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण द्यावे , मुंबई उच्य न्यायालयामध्ये महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंचाच्या वतीने दाखल याचिकेची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करावी , या केसाचा संपूर्ण खर्च राज्य शासनाने उचलावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत . चौंडी येथे धनगर समाजाच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनाची शासनाने तात्काळ दाखल घेऊन मार्ग काढावा अशीही मागणी करण्यात आली .


चौंडी येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचं यावेळी माजी आमदार रामहरी रूपावर यांनी सांगितले . यावेळी बोलतांना रुपावर यांनी म्हटलं की, 'राज्य सरकार ना धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी शिफारस करतयं, ना बंद पडलेलं एनटी आरक्षण सुरु करत आहे. त्यामुळे हा धनगर समाजावर मोठा अन्याय होतोय. आता न्याय मिळण्यासाठी धनगर समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजाने लढाई सुरु केली आहे.


मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्यभरात ओबीसी आणि धनगर समाजाकडून देखील आंदोलन करण्यात आले. तर सध्या धनगर समाजाकडून करण्यात येणाऱ्या या आंदोलनाला राज्य सरकार किती गांभीर्याने घेणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर यानंतर धनगर समाजाकडून कोणती पावलं उचलली जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे.