धुळे : वीजनिर्मिती कंपनी महाजेनकोकडे चार दिवस पुरेल एवढाच कोळसा उपलब्ध आहे. कारण ज्या कंपनीकडून महाजेनकोला कोळसा पुरवला जातो, त्याच कंपनीकडे कोळशाचा तुटवडा आहे. मात्र केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या सहकार्यामुळे हा प्रश्न लवकरच निकाली निघेल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.


राज्यातील भारनियमन हे तात्पुरत्या स्वरूपाचं असल्याचा पुनरुच्चार चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळ्यात केला. मात्र असं असलं तरी कोळशाची आवक कमी झाल्याने ही परिस्थिती उदभवली. वीज सर प्लस असली तरी मागणी आणि पुरवठा यातील तफावत बघता राज्यात सरसकट भारनियमन नाही. ज्या भागांमध्ये वीज बिलं थकीत आहेत, वीज गळतीचं प्रमाण जास्त आहे, अशाच भागात भारनियमन केलं जात आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

दरम्यान नाशिक येथील जनता दरबारात वीज चोरी झाली नसल्याचं ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केलं. नाशिकमध्ये मंगळवारी रात्री ऊर्जामंत्र्यांचं स्वागत वीज पुरवठा खंडीत करुन केलं, याकडे नागरीकांनी बावनकुळे यांचं लक्ष वेधलं. नाशिकमध्ये महावितरणने जनता दरबारचं आयोजन केलं होतं.

थोडासा पाऊस पडला तरी नाशिकमधली वीज गुल होते, वीज बिल वेळेवर आणि अचूक मिळत नाही, तक्रार निवारण केंद्रात कुणी फोन घेत नाही, वितरण व्यवस्थेतील अनेक कामं प्रलंबित आहेत, अशा अनेक समस्यांचा पाढा या जनता दरबारात मांडला गेला. यावर संतप्त झालेल्या बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.