Anjali Damania : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टिप्पणी केल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरावर शिवसेना शिंदे गटाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉमेडियन कुणाल कामराविरुद्ध मुंबईतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी BNS च्या कलम 353(1)(b), 353(2) आणि 356(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली. हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना नेते राहुल कनाल यांच्याविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे चार वाजता पोलिसांनी राहुल कनाल यांना ताब्यात घेतले. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत राहुल कनालसह सुमारे 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement


ह्याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, जी आपल्याला दिसली 


दरम्यान, कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संताप व्यक्त करताना पहिल्यांदात शिंदे गटाच्या तोडफोड करणाऱ्या सगळ्यांवर एफआयआर झाला पाहिजे, अशी मागणी केली. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कुणाल कामरा जे म्हणाले ते जर अवडलं नसेल तर त्यांच्या विरुद्ध कायद्याने लढणं अपेक्षित आहे, पण स्वतः सत्तेत असताना कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिवीगाळ करणं, तोडफोड करणं ह्याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, जी आपल्याला दिसली. कामरावर सोडा आधी FIR हा शिंदे गटाच्या ह्या सगळ्यांवर झाला पाहिजे. त्या हॉटेलचे झालेले नुकसान सुद्धा शिंदेंनी भरून दिले पाहिजे. आपण लोकशाहीत राहतो आणि इथे कायद्याचे राज्य राहील, गुंडगिरीचे नाही.






एकनाथ शिंदेंवर कुणाल कामरा काय म्हणाला?


कुणाल कामराने त्याच्या शोमध्ये एका बॉलिवूड गाण्याचे विडंबन गायले होते. त्यामुळे शिंदे गटात चांगलीच नाराजी पसरली. काही दिवसांपूर्वी कामरने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून महाराष्ट्र पॉलिटिक्सवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये कुणाल कामरा याने 'दिल तो पागल है' चित्रपटातील 'भोली सी सूरत...' या हिंदी गाण्याच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटले होते. कुणाल कामराने विडंबन करत म्हटले होते की, "शिवसेना भाजपमधून बाहेर पडली. त्यानंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी बाहेर पडली. एका मतदाराला 9 बटणं दिली गेली. सगळ्यांना गोंधळात टाकलं. पक्ष एका व्यक्तीने सुरू केला. तो मुंबईचा खूप मोठा जिल्हा असलेल्या ठाण्यातून येतो. यानंतर कुणाल गातो, "ठाणे की रिक्शा, चेहरे पर दाढ़ी, आंखो में चश्मा, मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर..."


यानंतर कामरा म्हणाला की, "हे त्यांचे राजकारण आहे. त्यांना कौटुंबिक कलह संपवायचा होता. त्यांनी कोणाच्या तरी वडिलांची चोरी केली. याला काय उत्तर देणार? मी उद्या तेंडुलकरांच्या मुलाला भेटू का, भाऊ, चला जेवायला जाऊया. मी तेंडुलकरचे कौतुक करतो आणि त्याला सांगतो, भाऊ, आजपासून ते माझे वडील आहेत."