पूर परिस्थिती पाहण्यासाठी तहसीलदारांची दोन किलोमीटर पायपीट, वाळू विक्रीची परवानगी द्या, शेतकऱ्यांची मागणी
लातूर जिल्ह्यातील गौर गावात देखील मांजरा नदीने पात्र बदलल्याने मोठा पूर आला होता. यामुळं सुमारे दोनशे एकर शेत जमिनीवर वाळूचे जाड थर साचले आहेत.
Latur News : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी आला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडला होता. यामुळं अनेक भागातील नद्यांना पूर आला होता. यामुळं शेती पिकांचं घरांच मोठं नुकसान झालं आहे. उभी पिक वाहून गेली आहेत, तसेच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील गौर गावात देखील मांजरा नदीने पात्र बदलल्याने मोठा पूर आला होता. यामुळं सुमारे दोनशे एकर शेत जमिनीवर वाळूचे जाड थर साचले आहेत. या पूरग्रस्त भागाती आज तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी दोन किलोमीटर पायपीट केल्याचं पाहायला मिळालं.
पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांवर भीषण संकट कोसळले आहे
दरम्यान, पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांवर भीषण संकट कोसळले आहे. त्यांच्या या स्थितीची बातमी एबीपी माझाने सर्वप्रथम दाखवली आणि त्याचा त्वरित परिणाम झाला आहे. यानंतर निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी स्वतः गौर गावाला भेट देत दोन किलोमीटर पायपीट करत वाळूने भरलेल्या शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी या वेळी तहसीलदारांसमोर आपली व्यथा मांडली. मनरेगातून काही मदत मिळते, पण त्यात एक एकर शेतही नीट होत नाही. त्यामुळे या शेतातील वाळू विकण्याची परवानगी द्यावी,” अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी यावर थेट भूमिका घेऊ शकत नाही. मात्र शेतकऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले जाईल. नुकसान प्रचंड आहे, त्याची संपूर्ण माहिती वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल अशी माहिती तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी दिली.
गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला
गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला होता. यापावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीतझाल्याचं पाहायलामिळालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले होते. या पुराचं पाणी अनेकांच्या घरात शिरलं होतं. त्यामुळं संसार उघड्यावर होते. तर दुसऱ्या बाजूला जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर देखील मोठं संकट आलं होतं. अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती, तर काही शेतकऱ्यांची पिकाबरोबर जमिन देखील वाहूनगेली होता. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान या पुरामुळं झाल्याचं पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या:
महापुरात ऊसाबरोबर जमिनही गेली वाहून, प्रशासनाच्या चुकीचा फटका, शेतकऱ्याचा आरोप, संरक्षक भिंत बांधून देण्याची मागणी


















