प्रकल्पात पाणी असूनही औसेकरांचा घसा कोरडा, नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळं पाणीटंचाई
50 हजार लोकसंख्या असलेल्या औसा शहर सध्या कृत्रिम पाणीटंचाईच्या संकटात आहे. नगरपरिषदेच्या भोंगळ कारभार आणि वितरण व्यवस्थेतील अभावामुळं पाणीटंचाईचं संकट उभं ठाकलं आहे.
Latur : 50 हजार लोकसंख्या असलेल्या औसा शहर सध्या कृत्रिम पाणीटंचाईच्या संकटात आहे. नगरपरिषदेच्या भोंगळ कारभार आणि वितरण व्यवस्थेतील अभावामुळं पाणीटंचाईचं संकट उभं ठाकलं आहे. औसा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी आणि उटी प्रकल्पात भरपूर पाणीसाठी असूनही शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या पाण्यामुळं औसेकर त्रस्त
औसा शहरातील बिलाल नगर आणि समता नगर या भागातील महिला नगरपरिषदेत ठाण मांडून आहेत. मागील अनेक दिवसापासून व्यवस्थित पाणीपुरवठा व्हावा ही प्रमुख मागणी आहे. दहा ते पंधरा दिवसाला जे पाणी येतं ते दूषित आहे. हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या पाण्यामुळं औसेकर त्रस्त आहेत. वेळोवेळी अर्ज विनंती केल्या, मात्र उपयोग नाही. यामुळं आज या महिलांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या रिकामा खुर्चीला निवेदन देत निषेध व्यक्त केला आहे. औसा शहर ऐतिहासिक शहर म्हणून याची ओळख आहे, येथील किल्ला ऐतिहासिक काळापासून नावाजलेला आहे. या शहराची लोकसंख्या 50 हजाराच्या घरात आहे. आजूबाजूच्या खेड्याची बाजारपेठ म्हणून औशाची ओळख आहे. या शहराला पाणीपुरवठा करणारे माकणी धरण आणि उटी प्रकल्पात भरपूर पाणी आहे. मात्र, शहरात पाणी नाही अशी स्थिती आहे.
नवीन पाईपलाईनचे काम सुरु
औसा शहराची लोकसंख्या 50000 असून 5000 नळ जोडणी आहेत. अनेक अनाधिकृत नळ जोडण्या आहेत. दररोज औसा शहराला चार एमएलडी पाणी लागतं. औसा शहरात 25 वर्षांपूर्वीची पाईपलाईन अस्तित्वात आहे. नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे. जुन्या वितरण व्यवस्थेमुळं सर्व शहराला पाणी देणे अशक्य आहे. वाढीव शहर भागात पाईपलाईनचे काम झालं नाही जे झाले ते तुटपुंज आहे. यामुळं वितरण व्यवस्थेवर ताण येत आहे. वाढीव शहराच्या अनुषंगाने पाईपलाईनचे मागील अनेक वर्षात झालंच नाही. धरणात दररोज पाणीपुरवठा होईल इतका पाणीसाठा आहे. मात्र 15 दिवसातून पाणी येते. ते पाणी देखील दूषित आहे. पिवळं आणि हिरव्या रंगाचे पाणी आहे. याचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. येथील मुख्य अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे त्यामुळे ते मुख्यालय नसतात.
पाण्यासाठी पैसा खर्च करण्याची वेळ
दहा ते पंधरा दिवसात पाणी येतं तेही दूषित मिळत असल्यामुळे औसा येथील अनेक नागरिक संतप्त आहेत. समता नगर आणि बिलाल नगर भागातील महिला वेळोवेळी नगरपरिषदेमध्ये तक्रार घेऊन येत आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. नगरपरिषदेचे काही भागांमध्ये बोर चालू आहेत. मात्र त्याचा बिघाड झाला तर पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. महिन्याला दोन ते अडीच हजार रुपये पाण्यासाठी खर्च करण्याची अनेक कुटुंबावर वेळ आली आहे. प्रशासनाचा नियोजनाचा अभाव आहे. जुनी वितरण व्यवस्था, दूषित पाण्याचा पुरवठा, अधिकाऱ्यांकडे असलेला अतिरिक्त कार्यभार या सर्वांचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. धरणात पाणी असतानाही पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांवर आर्थिक भूर्दंड बसत आहे.
























