पावसाची ओढ, डोक्यावर दोन लाखांचं कर्ज, लातुरातील शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 23 Jul 2019 11:45 AM (IST)
मागील काही वर्षांपासून कधी रब्बी तर कधी खरीप हातातून गेले. त्यातून होणाऱ्या आर्थिक फटक्यातून सावरण्याची संधी निसर्गच देत नसल्याने शिवाजी पवार यांना कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता. अखेर या सर्व प्रश्नांवर पर्यायी व्यवस्था होत नसल्याने शिवाजी पवार यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली.
लातूर : पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्याचे अर्थकारण पार कोलमडून पडले आहे. सततच्या दुष्काळातून बाहेर कसे पडायचे याचे गणित जुळत नसल्याने आयुष्यातील बाकीचे दिवस वजा करुन टाकण्याची मनोवृत्ती वाढली आहे. काहीसा असाच प्रकार लातूर जिल्ह्यात घडला आहे. लातूर जिल्ह्यातील रायवाडी गावातील 45 वर्षांचे शेतकरी शिवाजी ज्ञानोबा पवार यांनी विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवली.सोमवारी दुपारी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केले. यातच त्यांचा मृत्यू झाला. लातूरच्या सरकारी दवाखान्यात त्यांना मृत घोषित करण्यात आले. शिवाजी पवार यांची शेती दोन एकर असून चार मुले आहेत. त्यांनी सिद्धेश्वर सहकारी बँक लातूर येथून दोन लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. पावसाने ओढ दिली, बी भरण करण्यासाठी पैसे नाहीत, तरीही उधार उसनवारी करुन तयारी करुन ठेवली ती आशाही पावसाने मोडीत काढली. दोन म्हैस होत्या मात्र चारा आणि पाण्याच्या कमतरते मुळे सांभाळणे अवघड जात होते. त्यातच आर्थिक निकड यामुळे एक म्हैस विकली तरीही भागत नसल्याने शिवाजी पवार हतबल झाले होते. मागील काही वर्षांपासून कधी रब्बी तर कधी खरीप हातातून गेले. त्यातून होणाऱ्या आर्थिक फटक्यातून सावरण्याची संधी निसर्गच देत नसल्याने शिवाजी पवार यांना कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता. अखेर या सर्व प्रश्नांवर पर्यायी व्यवस्था होत नसल्याने शिवाजी पवार यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. VIDEO | शिवसेना उमेदवार ओमप्रकाश राजेंचं नाव चिठ्ठीत लिहून शेतकऱ्याची आत्महत्या | उस्मानाबाद | एबीपी माझा