Larur : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावात धक्कादायक घटना घडली आहे. शिवाजी वाल्मिक मेळ्ळे (32) या तरुणाने जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज संध्याकाळी त्यांनी विजेच्या करंटाचा धक्का घेत जीवन संपवले आहे. मेळ्ळे यांनी वर्षभरापूर्वी मुलांसाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, प्रमाणपत्र न मिळाल्याने मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या. कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक तणाव यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
सुसाईड नोटमध्ये काय?
माझे दोन लेकर शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवत आहे.. लेकराला महादेव कोळ्याचं प्रमाणपत्र मिळत नाही. हे सरकार प्रमाणपत्र देत नाही. म्हणून मी करंटला धरून जीवन संपवतोय असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून, कोळी महादेव समाजाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीबाबत शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दोन वर्षापासून जात प्रमाणपत्र देण्याबाबत मल्हार कोळी आणि महादेव कोळी समाजाची मागणी
मागील दोन वर्षापासून या भागांमध्ये सातत्याने मल्हार कोळी आणि महादेव कोळी समाजाने उर्वरित महाराष्ट्र राज्य लागू असेलेले निकष आहेत तेच निकष लावून आम्हाला जात प्रमाणपत्र देण्यात यावेत. व्हॅलिडीटी सोपी आणि सहज करावी यासाठी आंदोलन उभं केलं होतं. 17 तारखेला मराठवाडा भर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर ही आत्महत्या आंदोलनाला आणखीन तीव्र करेल अशी चिन्ह आहेत.
गेल्या काही दिवसांत लातूर जिल्ह्यात दोन आत्महत्या
महाराष्ट्राच्या राजकारणात आरक्षणाचा मुद्दा कायमच तापदायक राहिला आहे. मात्र गेल्या काही दिवसांत लातूर जिल्ह्यात घडलेल्या दोन आत्महत्यांनी परिस्थिती अधिकच गंभीर केली आहे. मराठा आरक्षण, ओबीसींचा विरोध आणि महादेव कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न या तिन्ही आघाड्यांवर अस्वस्थता वाढत असून त्याचे थेट दुष्परिणाम जनजीवनावर दिसू लागले आहेत.
मराठा समाज आरक्षण आंदोलन आणि भरत कराडची आत्महत्या
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाने “कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समाविष्ट करा” ही मागणी आक्रमकपणे पुढे नेली. या मागणीला ओबीसी समाजाचा कडवा विरोध झाला. कारण त्यांना भीती आहे की त्यांच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येईल.या तणावाच्या पार्श्वभूमीवर लातूरच्या वांगदरी गावातील भरत कराड या तरुणाने “ओबीसी आरक्षण संपणार” या भीतीने आत्महत्या केली.ओबीसी नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांनी गावात जात ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असा शब्द दिलाय मात्र समाजातील खदखद काही केल्या कमी होत नाही. गावकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू करून ओबीसी आरक्षण टिकवण्या साठी निर्धार व्यक्त केला. संघर्ष आणखीन तीव्र करण्याचा इशाराही ते देतात.
महत्वाच्या बातम्या:
प्रेमसंबंधामुळे गावात बदनामी होण्याच्या भीतीने बापाने 17 वर्षीय मुलीला संपवलं, नंतर आत्महत्येचा बनाव रचला, जालन्यात थरारक घटना