कोल्हापूर : कोल्हापुरातील रंकाळा तलावात एका प्रेमीयुगलानं हाताला हात बांधून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यापैकी मयत महिला विवाहित आहे, तरुण अविवाहित आहे.


कोल्हापुरातील रंकाळा तलावात सकाळी दोन मृतदेह तरंगताना काही नागरिकांना आढळले. त्यांनी याची  माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिल्यावर हे दोन मृतदेह रंकाळ्यातील पाण्यातून बाहेर काढण्यात आले. यावेळी दोघा मृतदेहांचे हात बांधल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी अधिक तपास केल्यावर चांदी कारागीर विकास राजेंद्र राऊत आणि स्वाती सुनील सलगर यांचे मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं.

यादवनगर भागात राहणाऱ्या 35 वर्षीय विकास राऊतचे कागलमध्ये राहणाऱ्या त्याच्याच नात्यातील  स्वाती सलगर हिच्याही प्रेमसंबंध होते. चार दिवसांपूर्वीच कागल मधल्या यात्रेत जाण्यासाठी विकास घरातून निघाला. त्या दिवसापासून विकास आणि स्वाती हे दोघेही बेपत्ता होते. दोन्हीकडील नातेवाईकांनी शोधण्याचा प्रयत्न केला.

सोमवारी त्या दोघांनी एकमेकांचे हात बांधून रंकाळा तलावात आत्महत्या केल्याचं समोर आलं. स्वातीला दोन मुले असल्याची माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.