कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिर वादाने वेगळंच वळण घेतलं आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीतच अंबाबाई मंदिरातील पुजारी अजित ठाणेकर यांना बेदम मारहाण करण्यात आली.


अंबाबाईला घागरा हे वस्त्र का नेसवलं, यावरुन गेल्या काही दिवसांपासून वादंग माजला आहे. हाच प्रश्न पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाविकांनी श्रीपूजकांना विचारला. त्यावेळी अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे ठाणेकरांना मारहाण करण्यात आली.

दोनच दिवसांपूर्वी अंबाबाईच्या भक्तांनी पुजारी हटावच्या घोषणा देत एकच गोंधळ घातला आणि भ्रष्टाचाराचाही आरोप केला होता.

कोल्हापुरात अंबाबाईच्या भक्तांचा श्रीपूजकांवर भ्रष्टाचाराचा आरोप


अंबाबाईच्या साड्यांमध्येही भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप अंबाबाईची सेवा करणाऱ्या श्रीपूजकांवर केला जात आहे. मंदिराभोवती असलेल्या दुकानांमधून आलेल्या ओट्यांमधल्या साड्यांमध्येही खाबूगिरी होत असल्याचा आरोप आहे.

आधीच श्रीपूजक भक्तांच्या निशाण्यावर आहेत. त्यात त्यांनी थेट शाहूंच्या वटहुकूमाला तथाकथित म्हटल्यानं वाद आणखी चिघळला.

वादांची यादी खूप मोठी आहे.. आधी श्रीपूजकांनी तृप्ती देसाई यांना गाभाऱ्यात जाण्यापासून अडवलं, नंतर अंबाबाईचं नाव महालक्ष्मी करण्याचा आरोप पूजकांवर झाला. त्यानंतर अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाल्यानं देखरेखीवर आक्षेप घेतला.

महालक्ष्मीच्या माथ्यावरचा नाग हटवल्याचा आरोप करण्यात आला. निवृत्त पुरातत्व अधिकाऱ्याला मूर्तीची तपासणी करु दिल्याचा आरोप झाला. मग अंबाबाईला पारंपरिक साडीऐवजी घागरा आणि चोळी नेसवण्यात आली.