मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना आज राज्य सरकारकडून जारी करण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत व्यक्तीश: पाठपुरावा करण्याचा शब्द चंदगडवासियांना दिला होता.


कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेले चंदगड हे गाव तालुक्याचे ठिकाण असूनही तिथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. त्यामुळे चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा, अशी मागणी सातत्याने चंदगडवासियांकडून होत होती. या मागणीसाठी स्थानिकांनी सातत्याने शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन, यासंदर्भात मागणी केली होती. यावर पालकमंत्र्यांनी चंदगडवासियांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं होतं. अखेर दादांनी दिलेला शब्द पाळला आणि चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला.

या अधिसूचनेची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात चंदगडचे स्थानिक भाजप नेत्यांकडे सुपूर्द करण्यात आली. नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांचे आभार मानले.