Kirit Somaiyya : तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू झाली. ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच सकाळीच राज्यात खळबळ उडाली. यावर आता राजकीय, सामाजिक अशा विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान मलिकांच्या ED अटकेनंतर भाजपचे किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक गौप्यस्फोट


अनिल देशमुख, नवाब मलिकांनंतर आता तिसरा नंबर अनिल परबांचा? 


आधी अनिल देशमुख, नवाब मलिकांनंतर आता तिसरा नंबर अनिल परबांचा. असा दावा भाजपचे किरीट सोमय्या यांनी केलाय.ठाकरे सरकारने कितीही दादागिरी, माफियागिरी केली तरी उद्धव ठाकरेंच्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही, महाराष्ट्र घोटाळेमुक्त करणारच अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली आहे. दरम्यान अनिल देशमुख नंतर आत्ता नवाब मलिक जेल मध्ये, अनिल परब यांनाही आता हिशोब द्यावा लागणार असे सांगत ट्विट केलंय


 






नवाब मलिक यांचं कारस्थान जनतेसमोर


नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांना आक्रमक प्रत्युत्तर देत आव्हान दिलं होतं. एनसीबीच्या कारवाईवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यावरून भाजप आणि मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मलिकांवर गंभीर आरोप केले होते. अशातच आता मंत्री नवाब मलिक यांचं कारस्थान हळूहळू जनतेसमोर येत आहे, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी नवाब मलिकांवर टीका केली आहे. 


राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ


नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात नेण्यात येण्याची शक्यता आहे. दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ईडी अधिकारी मलिक यांचे घरी दाखल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्या भावाला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, मलिक यांना समन्स देण्यात आले नव्हते.