सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील देवगड मधील ऐतिहासिक ‘गाबतमुमरी’ अर्थात ‘तारामुंबरी’ गावातील खवळे या कुटुंबामध्ये गेली 320 वर्षे गणपती उत्सव साजरा केला जात आहे. या गणपतीची कहाणीही तितकीच रंजक आहे. खवळे घराण्यातील शिवतांडेल नामक सरदार विजयदुर्ग किल्ल्यावरील सरखेल कान्होजी आंग्य्रांच्या आरमारात होता. त्याच्या ताब्यात अनेक गुराब जातीची गलबते होती. ती मुंबरीच्या खाडीत नांगरलेली असत. शिवतांडेल तरणाबांड असून लग्नाला सात वर्षे झाली तरी त्याची वंशवृद्धी होत नव्हती. मालवण या मूळ गावातील नारायण मंदिरातल्या गणेशाने दृष्टांत देऊन आपली स्थापना करण्याची आज्ञा झाल्यावर 1701 मध्ये खवळे गणपतीची रितसर स्थापना करण्यात आली. त्याचे फळ म्हणून त्यांना पुत्ररत्न झाल्याने त्याचे नाव गणोजी असे ठेवले. पुढे विजयदुर्ग किल्ल्यावर लढाईत शिवतांडेल यांना अटक झाली व नंतर त्यांचे निधन झाले. आजही त्यांची समाधी तारामुंबरीत खवळ्यांच्या शेतात आहे. आज त्यांची 10 वी पिढी तितक्याच आनंदाने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात.


या महागणपतीचे वैशिष्टयही नावीन्यपूर्ण असून जगात कुठेही न आढळणारे असेच काहीसे दिसून येते. हा गणपती अन्य कारागिराकडून न बनवता स्वत: खवळे कुटुंबातील व्यक्तीच बनवतात. कोणताही साचा न वापरता हा गणपती खवळे कुटुंबीय बनवतात. तशी प्रथाच पूर्वापार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आली आहे. सुमारे दीड टन माती त्यांच्याच शेतजमिनीतून आणाली जाते. नारळी पौर्णिमेला सुवर्ण नारळ सागराला अर्पण केल्यानंतर मूर्ती घडवण्यास प्रारंभ होतो. मूर्ती बैठी व पावणे सहा फूट उंचीची असते. दरवर्षी कोणताही बदल न करता एकच आकार, तेच रूप व रंग आणि उंची असते. गणेश चतुर्थीला संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून फक्त डोळे रंगविले जातात. याच स्वरूपात त्याची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा होते. तर दुस-या दिवशी उंदीर पूजेला लावतात. त्यावेळी खीर नैवेद्य म्हणून दाखवल्यावर ती शेतातही समाधीस्थळाजवळ ठेवली जाते. तिस-या दिवशी रंग कामाला सुरुवात होते. तर पाचव्या दिवशी संपूर्ण रंगकाम पूर्ण होते. संपूर्ण अंगाला लाल रंग, चंदेरी रंगाचा अंगरखा, पिवळे पीतांबर, सोनेरी मुकुट, त्यावर पाच फण्यांचा नाग, मागे गोल कागदी पंखा व हातावर शेला अशी विलोभनीय मूर्ती साकारली जाते. नंतर 7, 11, 15, 17 व 21 व्या दिवशीपर्यंत सतत रंगकाम सुरूच असते. विसर्जनाच्या दिवशी दुपारी पिवळे ठिपके दिले जातात. त्यामुळे मूर्तीचा चेहरा काहीसा उग्ररूप धारण केल्याप्रमाणे दिसते. अशा प्रकारे 21 दिवसात विविध रूपे साकारणारा असा हा एकमेव महागणपती असावा. पहिले पाच दिवस दोन वेळा व नंतर दिवसातून तीन वेळा आरती केली जाते. दररोज रात्री भजन केले जाते. पाचव्या दिवसापासून रोज तिन्ही सांजेला गणपतीची दृष्ट काढली जाते. हे एक विशेष म्हणावे लागेल. अलीकडे भाविकांची गर्दी वाढू लागल्याने हा उत्सव 21 दिवस अधिकाधिक जल्लोषात साजरा करण्यात येतो.


विसर्जनाच्या आदल्या दिवशीची रात्र लळित अर्थात जागर म्हणून साजरी केली जाते. या वेळी संध्याकाळी खवळे घराण्यातील पूर्वजांच्या पगडयांची विधिवत पूजा केली जाते. त्यास ‘जैनपूजा’ म्हणतात. या वेळी विशिष्ट आरती म्हणताना भजन, मृत्ये, नाटयछटा व फुगडयांचा कार्यक्रम सादर केला जातो. मध्यरात्री तमाशाचे आयोजन केले जाते. त्यात पुरुषाला साडी नेसवतात. पहाटे अंगात वारी (अवसर) येतात. तेव्हा नवस फेडणे व नवे नवस बोलणे, पुरुषांचा फुगडय़ांचा कार्यक्रम व महागणपतीची आरती करून दृष्ट काढली जाते.


विसर्जनाच्या दिवशी सकाळी खवळे कुटुंबीयांच्या पूर्वजनांना ‘पिंडदान’ केले जाते. गणेशोत्सवात पिंडदान होणारा हा जगातील एकमेव गणपती असावा. या वेळी भाविकांना दुपारी महाप्रसाद दिला जातो. याचे विसर्जन मंगळवार व शनिवार या दिवशी वर्ज्य असते. विसर्जन सोहळाही भव्यदिव्य स्वरूपात असतो. मूर्ती गाडीवर रथात बसवली जाते. ढोल, ताशे, लेझिम या वाद्यांसह भगवे झेंडे, तलवारी नाचवत, फटाक्यांच्या आतषबाजीत ‘मोरयाऽऽऽ’चा गजर करत मूर्तीला गुलाल रंगाची उधळण करीत समुद्रकाठी विसर्जन करण्यासाठी आणतात. तेथे दांडपट्टा, बनाटी, तलवार व लाठी असे शिवकालीन मर्दानी प्रकार खेळले जातात. विसर्जन सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील शेकडे भाविक, खवळे बांधव, त्यांचे सर्व पाहुणे व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित असतात. पुरुष मंडळी फेर धरून नाचू लागले की, निरोपाची वेळ येते. पाण्यात प्रथम उंदीरमामाला नेण्यात येते. नंतर सागाची फळी पाटाखाली घालून महागणपती खांद्यावरून पाण्यात नेला जातो आणि विधीवत विसर्जन केले जाते.


यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने काहीसा साध्या पद्धतीने खवळे महागणपती उत्सव साजरा केला जात आहे. मात्र 21 दिवस दरवर्षीप्रमाणे सर्व विधिवत पूजा व इतर कार्यक्रम केले जाणार आहेत. खवळे गणपती हा खवळे कुटुंबीयांचा घरगुती गणपती असून त्याची जगभर महागणपती म्हणून प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे खवळे गणपतीची लिम्का बुक मध्ये नोंद झाली आहे.


माझं गाव माझा बाप्पा! राज्यभरातील गणेशोत्सवाच्या घडामोडी एका क्लिकवर