Kartik Vajir  Bhorya Speech : स्वातंत्र्य दिनी (Independence Day 2025) जालना जिल्ह्यातील रेवल गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथी वर्गात शिकणाऱ्या कार्तिक वजीर उर्फ भोऱ्या (Kartik Vajir  Bhorya Speech) या विद्यार्थ्याने आपल्या भाषणाने उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकलीच, पण त्याहीपेक्षा त्याने समाजातील विषमतेवर, राजकारणातील दुटप्पीपणावर आणि शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवर थेट भाष्य करून अनेकांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं.

देशाच्या प्रगतीचा आढावा घेत जबाबदाऱ्यांची जाणीव

कार्तिकने भाषणाची सुरुवात देशाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञान, शेती आणि उद्योगधंद्यांतील प्रगतीचा उल्लेख करत केली. मात्र त्याच वेळी गरिबी व श्रीमंतीतील दरी वाढत असल्याचे त्याने स्पष्टपणे नमूद केले. स्वातंत्र्य मिळाले की सगळ्यांना वाटतं मी हे करू शकतो ते करू शकतो. जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचं काय? स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताने खूप प्रगती केली आहे. विज्ञान तंत्रज्ञान शेती उद्योगधंदे यांची भरभराटी सुरू आहे. पण गरिबी आणि श्रीमंती वाढतच चालली आहे. धनधांडगे लोक गोरगरिबांना लुटत आहे, राजकारणी शेतकऱ्यांना छळत आहेत, असे त्याने म्हटले.  

माणिकराव कोकाटेंवर निशाणा

कार्तिकने तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला. तर शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या आर्थिक अस्थिरतेबाबत भाष्य करत त्याने मंत्र्यांच्या संवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपण निवडलेला मंत्री विधानसभेमध्ये रमी खेळतो, तरी त्याला याचं काही वाटत नाही. शेतकरी इथं शेतीत लाखो रुपये टाकतात, पिक येईल का नाही? हे त्यांना माहीत नसतं. आमचा मंत्री शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवायच्या सोडून विधानसभेमध्ये पत्ते खेळतो, किती दुर्दैव आहे आमचं, अशी टीका त्याने यावेळी माणिकराव कोकाटे यांच्यावर केली आहे. 

सत्यासाठी ठाम भूमिका घेण्याचे आवाहन

"तुम्हाला स्वातंत्र्य मिळालंय सन्मानाने जगण्यासाठी, सत्यापासून दूर जाऊन लाचारी स्वीकारण्यासाठी नाही,” असं सांगत त्याने खोट्याला खोटं म्हणण्याचं आणि सत्यासाठी उभं राहण्याचं आवाहन केलं.

शिक्षकांकडून भोऱ्याचे कौतुक

या भाषणाने उपस्थित शिक्षक, पालक व ग्रामस्थ भारावून गेले. कार्तिकने मांडलेले मुद्दे केवळ चौथीच्या विद्यार्थ्याचे नसून, समाजाच्या मनात असलेल्या प्रश्नांची प्रखर मांडणी असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. शाळेतील शिक्षकांनी कार्तिकच्या आत्मविश्वासाचं आणि प्रगल्भ विचारांचं विशेष कौतुक केलं आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : आंदोलन जालन्यात कर, मुंबईत कर किंवा दिल्लीत कर, त्याला कोण आडवतंय, जरांगेंच्या निर्धारावर भुजबळांची प्रतिक्रिया

Dattatray Bharne: दत्तात्रय भरणेंनी हाती घेतला कृषीमंत्री पदाचा पदभार; फडणवीसांच्या भेटीनंतर म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं, राज्यात प्रत्येक ठिकाणी...'