मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतविरोधात मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी कोर्टानं जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनीही कंगना रणौतविरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणी कोर्टानं कंगनाला समन्स जारी करत 1 मार्चच्या सुनावणीत हजर राहण्याचं समन्स जारी केलं होतं. मात्र कंगना य सुनावणीस गैरहजर राहिल्यानं कोर्टानं कंगनाविरोधात ही दंडात्मक कारवाई केली आहे.


कंगनाच्यावतीनं तिचे वकील रिझवान सिद्धीकी यांनी सोमावरी कोर्टाला सांगितलं की, कंगना ही सध्या शूटींगमध्ये व्यस्त आहे, तसेच काही वैयक्तिक कारणास्तव ती या सुनावणीस हजर राहू शकली नाही. त्यामुळे कंगनापुढे यासंदर्भात आता अंधेरी दंडादिकारी कोर्टात हजर राहून रितसर जमीन घेणं किंवा या वॉरंटच्या कारवाईला हायकोर्टात आव्हान देणं हे दोन कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत. कोर्टानं याप्रकरणाची पुढची सुनावणी 26 मार्चला होणार आहे. दरम्यान याप्रकरणी लवकरच हायकोर्टात दाद मागणार असल्याचं कंगानाच्या वकिलांनी एबीपी माझाला सांगितलं.


मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आपला चौकशीचा प्राथमिक अहवाल कोर्टात सादर केला. मात्र कंगनाचा यासंदर्भात जबाब नोंदवणं अद्याप बाकी असल्याचं पोलिसांच्यावतीनं कोर्टाला सांगण्यात आलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जावेद यांचाही उल्लेख केला होता. यामध्ये तिने एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधाने केली आहेत. या व्हिडिओला यू ट्यूबवर लाखो हिटस मिळाल्या आहेत.


मात्र, "या संवेदनशील प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना माझ्यावर धादांत खोटे आणि आधारहीन आरोप कंगनाने केले आहेत. यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून मला नाहक प्रचंड मनस्ताप झाला आहे, त्यामुळे कंगनावर फौजदारी खटला चालवावा", अशी मागणी जावेद अख्तर यांनी या दाव्यामध्ये केली आहे. आयपीसी कलम 499 आणि 500 नुसार अब्रुनुकसानी केल्याचा खटलाही दाखल करण्याची मागणी जावेद अख्तर यांनी कोर्टाकडे केली आहे.


कंगनाने बॉलीवूडमध्ये माफिया राज असल्याचा आरोप सोशल मीडियावर आणि रिपब्लिकच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला आहे. दिग्दर्शक महेश भट आणि अख्तर यांचा यामध्ये थेट उल्लेख केलेला होता. सोशल मीडियावर या व्हिडीओला लाखो हिट्स मिळाले आहेत.