Mira Bhayandar Thane News : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जावेद पठाण (वय 66) असे मृत उमेदवाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जावेद पठाण यांनी सकाळी 10 ते 11 या वेळेत प्रभाग क्रमांक 22 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

दरम्यान, जावेद पठाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिरा रोड येथील हैदरी चौक परिसरात त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ उपचारासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मिरा–भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्याने सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

भाईंदरमध्ये भाजपाच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका आला 

भाईंदरमध्ये भाजपाच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून मुलगी श्रद्धा बने हिला उमेदवारी न मिळाल्याच्या धक्क्यातून वनिता बने यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यांना तातडीने मिरा रोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या प्रसंगानंतर वनिता बने यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी निष्ठेने पक्षाचे काम केले, पक्षासाठी अंगावर खटलेही घेतले. मात्र आज पक्षाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना त्यांनी अश्रू अनावर होत व्यक्त केली.

मीरा–भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली

मीरा–भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे. भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी युती तुटल्याच जाहीर केलं आहे. यानंतर लगेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही पत्रकार परिषद घेत भाजपाचे स्थानिक नेते आणि आमदार नरेंद्र मेहता यांचं थेट नाव घेत, यांच्या अंहकार आणि घमेंडी मुळे युती तुटल्याचा गंभीर आरोप केला आहे. पहिल्यापासून येथील भाजपाला शिवसेनेला जवळ घ्यायचं नव्हतं,  शिवसेनेला वाटा द्यायचा नव्हता, शहरात स्वतःच अस्तित्व जास्त दाखवायचं आणि शिवसेनेला कमी लेखायचं असं भाजपाच  चाललं होतं असे सरनाईक म्हणाले. युती हवी असती तर त्यांनी समोरुन बोलणं केलं असतं. परंतू, मला 50 मिनिटं थांबवलं 13 जागा देतो असं  आम्हाला सांगितलं.  सहकार्य केलं तरच तुमच्या 13 जागा येतील असं म्हटलं होतं. नरेंद्र मेहता यांना घमेंडी आणि अहंकार आल्याच दिसून आलं असल्याचं गंभीर आरोप सरनाईक यांनी केला. शिवसेना 95 पैकी 81 जागांवर लढणार असल्याचं सरनाईक यांनी घोषित केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Mahnagarpalika Election 2026: शेवटच्या दिवशी राज्यभरात उद्रेक, युती-आघाडींमध्ये बिघाडी, कोणत्या मनपात लढत कशी?