Jalgaon News : चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!
Jalgaon News : खेळताना बालकाने ॲल्युमिनियमचे भांडे डोक्यात घातले. मात्र काही वेळातच भांडे डोक्यात व मानेजवळ इतकी घट्ट अडकले की त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याने जोरात आरडाओरडा सुरू केला.

Jalgaon News : खेळताना लहान मुले काय उपद्व्याप करतील याचा भरोसा नसतो, अशीच एक धक्कादायक घटना जळगाव शहरात समोर आली आहे. खेळताना साडेतीन वर्षाच्या बालकाने ॲल्युमिनियमचे भांडे डोक्यात घातले. मात्र काही वेळातच भांडे डोक्यात व मानेजवळ इतकी घट्ट अडकले की त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याने जोरात आरडाओरडा सुरू केला. घाबरलेल्या पालकांनी मुलाला घेऊन एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात धावपळ सुरु केली. भांडे काढताना गंभीर इजा होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक डॉक्टरांनी हात वर केले.
Jalgaon News : ग्राइंडर कटरच्या साहाय्याने भांडे कापलं, 12 मिनिटांच्या प्रयत्नानंतर यश
अखेर मेहरूण परिसरातील सारा हॉस्पिटलचे डॉ. मीनाज पटेल यांनी धोका पत्करून उपचार करण्याचा निर्णय घेतला. भांडे काढताना बालकाला इजा होऊ नये यासाठी त्यांनी रुग्णालयात काम करणारे प्लंबर खालिद शेख यांना बोलावले. त्यांनी वुडन पीयूसी शीट आणि ओले कापड लावून सुरक्षितता उपाय करत ग्राइंडर कटरच्या साहाय्याने भांडे कापण्यास सुरुवात करण्यात आली. सुमारे 12 मिनिटांच्या प्रयत्नानंतर भांडे यशस्वीपणे कापून वेगळे करण्यात आले. काही तासांपासून घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या बालकाने आणि त्याच्या पालकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Jalgaon News : जळगावच्या पेस IITच्या विद्यार्थ्यांचे 'जेईई परीक्षेत 'मध्ये दैदीप्यमान यश; अथर्व चव्हाणला 99.78% मार्क्स
जळगाव मधील पेस आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे 'जेईई परीक्षेत 'मध्ये दैदीप्यमान यश मिळवलं आहे. अथर्व चव्हाण याने 99.78% मार्क्स मिळवत खानदेशात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. परिणामी त्याचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'जेईई मेन्स' (जानेवारी २०२६) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात जळगाव येथील 'पेस आयआयटी आणि मेडिकल'च्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
संस्थेचा विद्यार्थी अथर्व चव्हाण याने 99.78% गुण मिळवून जळगाव, धुळे व परिसरातील जिल्ह्यांच्या शैक्षणिक इतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अथर्वच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण खानदेशच्या शैक्षणिक वैभवात भर पडली आहे. अथर्वसोबतच संस्थेच्या इतर विद्यार्थ्यांनीही उत्तुंग भरारी घेतली आहे. यामध्ये प्रामुख्याने:
सारंग वाणी: ९८.२६ पर्सेंटाईल
आयुषी पाटील: ९७.४२ पर्सेंटाईल
भक्ती मकवाना: ९६.१५ पर्सेंटाईल
अनिकेत सिंग: ९३.०७ पर्सेंटाईल
या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या 'पेस' व 'जयिष्णू आयआयटी गुरुकुल'च्या संचालिका सौ. सविता वाणी, श्री. दिलीप वाणी व संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. योग्य नियोजन, अचूक मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळेच हे यश साध्य करता आले, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, नीटची (NEET) तयारी करणाऱ्या आयुषी पाटील हिने केवळ भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील उत्तम गतीमुळे जेईई परीक्षेतही घवघवीत यश मिळविले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























