जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने लाखांचा आकडा पार केला आहे तर सतराशेच्या पुढे रुग्ण हे कोरोनाने मृत्यू पावले आहे. असे असताना कोरोनाच्या वेगाने आलेल्या दुसऱ्या साथीने प्रशासनाच्या आणि जनतेच्या मनात चांगलीच भीती निर्माण केल्याचं पाहायला मिळत होते. मात्र, मागील आठवडाभराचा विचार करता बाधीत होणाऱ्या रुग्ण संख्येत दिवसागणिक घट होत असल्याने आणि बाधित होणाऱ्या एवढेच रुग्ण बरे होऊन परत जात असल्याने प्रशासन आणि जनतेच्या दृष्टीने मोठा दिलासा देणारी बातमी ठरली आहे.
     
जळगाव जिल्हा हा कोरोनाच्या बाबतीत सुरुवातीपासून हॉटस्पॉट ठरला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तर कोरोनाचा मृत्यूदर हा तेरा टक्क्यापर्यंत इतका जाऊन पोहोचला असल्याने  केवळ देश पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर देखील जळगाव चर्चेचा विषय बनले होते. त्यानंतर मात्र प्रशासनाने सर्वच पातळीवर प्रयत्न करून मृत्यूदर कमी करण्यात यश मिळविल्याने प्रशासन आणि जनतेत काहीशी बेफिकिरी दिसून आल्याचं दिसून आल्याच समोर आले होते. त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या लाटेचे रूपांतर केव्हा समूह संसर्गात झाले हे कोणालाही कळले नव्हते.


सध्या जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर कोरोनाची दुसरी लाट ही उच्च पातळीवर असल्याचं पाहायला मिळत असल्याने आणि रोज साधारणपण बाराशे नवे रुग्ण आणि पंधरा बधितांचा मृत्यू असं समीकरण बनल्याने संपूर्ण जिल्हाभरात भीतीचं वातावरण पसरले असल्याचं दिसून येत होते. मात्र, गेल्या आठवड्याचा जर विचार केला तर दिवसागणिक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता काही प्रमाणात कमी होत असल्याचं समोर आल्याने जळगावकरांच्या दृष्टीने दिलासा देणारी बातमी आहे.


गेल्या आठवडाभरापासून अकराशे ते बाराशे नवीन बाधित रुग्ण समोर येत असले तरी त्यात बाधित होण्याच्या प्रमाणात घट झाल्याचे प्रशासनाने म्हटलं आहे. मागच्या महिन्यात बाराशे बाधित रुग्ण हे पाच ते सहा हजार चाचण्यांमध्ये येत होते. तेवढेच नवीन बाधित रुग्ण आता आठ ते दहा हजार चाचण्यांत येत असल्याने बाधित होण्याचा दर हा वीस टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर आला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणपण जवळपास तेवढेच असल्याने प्रशासनाच्या दृष्टीने आणि जनतेच्या दृष्टीने दिलासा देणारी बातमी ठरली आहे. अजूनही पुढील काही काळात दुसऱ्या लाटेचा जोर ओसरला जाईल, अशी शक्यताही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केली आहे.