मुंबई : महाराष्ट्रात उद्यापासून आपण अनेक निर्बंध शिथिल करत आहोत. मात्र कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाही. त्यामुळं काळजी घेणं आवश्यक आहे. आता आपण निर्बंध शिथिल करतोय मात्र पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी आतापासून खबरदारी घ्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण झालं. त्यावेळी त्यांनी जनतेला संबोधन केलं. 


Independence Day : पंडित नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकरांचे आज स्मरण, देश या सर्वांचा ऋणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी


मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणातील दहा महत्वाचे मु्द्दे 


छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांचे आक्रमण परतवून लावत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची बीजे रुजवली.परकीयांविरुद्ध आपण लढून जिंकू शकतो, आक्रमण परतवून लागू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवूनच नाही दिलं तर तसा विश्वासही आपल्याला दिला. 


शाहू महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेविरुद्ध लढा उभारून स्वातंत्र्य, समता म्हणजे काय हे सांगितले, त्यांनी स्वातंत्र्याचे महत्व आपल्याला पटवून दिले.


केवळ स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला महत्व नाही, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यात अनेकजण शहीद झाले. या सर्वांनी आपल्या समर्पणातून दिलेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे आपले कर्तव्य. त्या स्वातंत्र्याचे मूल्य जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.


कोरोनामुळे एक नवीन पारतंत्र्य आपण मागच्या दीड वर्षांपासून अनुभवतो आहोत. आता आपण बरीच बंधने शिथिल करत आहोत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. परदेशात काही ठिकाणी ते नव्याने उसळलेले आहे. आपल्याकडे हे संकट नव्याने उसळू नये म्हणून काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे.


राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी खबरदारी घ्या, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहन


गेल्यावर्षी आणि या वर्षीही दुसऱ्या लाटेत आपण कोरोनाचा कहर अनुभवला, आता काही प्रमाणात औषधं उपलब्ध झाली असली तरी पण ऑक्सीजनची अजूनही  कमी आहे. ऑक्सीजनचे प्रमाण लक्षात घेऊन आपण निर्बंधात शिथिलता आणत आहोत.


ही शिथीलता आणत असलो तरी आपल्याला काळजी घेणे अत्यावश्यक आहे, त्यामुळे  कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे माझे नागरिकांना विनम्र आवाहन आवाहन आहे. ऑक्सीजन क्षमता लक्षात घेतली आणि रुग्णसंख्या वाढू लागली तर नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावे लागेल.


या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक कोरोना योद्ध्यांनी दिवसरात्र संघर्ष केला.अनेकांना कोरोनाची बाधा झाली यात काहीजण बरे झाले काही जण दुर्देवाने शहीद झाले त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो.


राज्यात लसीकरणाने आता वेग घेतला आहे. कालच ९.५ लाख नागरिकांचे लसीकरण करून राज्याने देशात उच्चांक गाठला आहे. आपण जिद्दीने कोरोनाविरूद्ध लढत आहोत.


आपल्याला स्वातंत्र्य असंच नाही मिळालं, अनेकांच्या संघर्षातून आणि संकल्पातून उभ्या राहिलेल्या लोकचळवळीने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे.आज आपले हे स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी होत आहे. 


या निमित्ताने कोरोनापासून मी माझा देश, राज्य मुक्त करणार आणि पुढचा स्वातंत्र्य दिन मोकळेपणाने साजरा करणार असा निश्चय करूया.