मुंबई : महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ 22 ते 24 मे दरम्यान समुद्र खवळू शकतो. तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

IMD Warning Rain Update : मच्छीमारांनी घ्यावयाची सावधगिरी

- हवामान खात्याच्या अपडेट्स नियमितपणे तपासत राहावेत.- स्थानिक प्रशासन व मच्छीमार सहकारी संस्थांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.- खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे पूर्णतः टाळावे.- लहान बोटींचा वापर टाळावा, किनाऱ्यालगतच कार्य करावे.- सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने (लाईफ जॅकेट्स, वायरलेस सेट) जवळ बाळगावीत.- संभाव्य वाऱ्याचा वेग व लाटांचा जोर लक्षात घेऊन किनाऱ्यावरील होड्या व बोटी सुरक्षित स्थळी हलवाव्यात.- समुद्र खवळलेला असताना मासेमारी टाळून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी.

 

Maharashtra Rain Today : मुंबईसह राज्यभर दमदार पाऊस

राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुफान पावसानं हजेरी लावली आहे. मे महिन्याच झालेल्या दमदार पावसाच्या एण्ट्रीमुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं चित्र आहे.

मंगळवारी मुंबईसह उपनगरातही विजेच्या कडकडासह पाऊस सुरू झाला. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फूट पाणी भरले होते. पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचल्याचं दिसून आलं.

रत्नागिरी, सातारा, सोलापूरसह वर्ध्यातही मान्सून पूर्व पाऊस झाला. दरम्यान पुढचे चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

ही बातमी वाचा: