गडचिरोली : गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मुख्य मार्ग बंद पडले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 300 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.


गडचिरोलीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लहान मोठे नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. भामरागड शहराला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने पाणी शहरात घुसलं आहे. या पुरामुळे शहरातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त घरं पाण्यात गेली आहेत. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी हेलिकॉप्टरमधून येथील पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे. प्रशासनाकडून या संपूर्ण भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

गडचिरोली जिल्ह्यात 6 आणि 7 तारखेला अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आल होता मात्र हवामान खात्याने आजही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे लोकांना सतर्क राहण्याचे आणि गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे 6 आणि 7 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती.