कोल्हापूर: राज्यातल्या दोन कोटी विद्यार्थांचा विमा उतरवून विद्यार्थी आणि पालकांना संरक्षण देणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.


या विम्याद्वारे आई वडीलांच्या अपघाती मृत्यूनंतर शिक्षण थांबवावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. विमा संरक्षणामुळे अशा विद्यार्थ्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

नूल (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्ड स्थापणार : तावडे

सतत परीक्षेत अपयश येणार्‍यांच्या माथी नापासाचा शिक्‍का लागू नये, म्हणून त्या विद्यार्थ्याला कौशल्य आधारित शिक्षण देण्याचा विचार सुरु आहे. महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापुढे महाराष्ट्रात केवळ पुस्तकी आणि कालबाह्य शिक्षणाऐवजी मुलांना जीवन उपयोगी शिक्षण दिले जाईल, असं तावडे यांनी सांगितलं.