कोल्हापूर : ‘भाजपा सरकार आंधळं आणि बहिरं आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच प्रश्न मांडतो. पक्षानं काय कारवाई करायची ती करु दे.’ असं म्हणत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले हे आज (सोमवार) कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपच्या विरोधात भूमिका घेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. ‘राज्यातील मंत्र्यांमध्ये सुसूत्रता नाही. राज्यात मुख्यमंत्री फडणवीस आहेत की चंद्रकांत पाटील? हे देखील आता समजतं नाही.’ अशी बोचरी टीका पटोले यांनी केली आहे.

शेतकरी आणि महिलांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत आणि गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी लगाम घालावा. असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. असं म्हणत सरकारचं कर्जमाफीचं काम बरोबर नसल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

‘भाजपा सरकार आंधळे आणि बहिरं आहे. त्यामुळं सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मी नेहमीच बोलणार. पक्षाने कारवाई केली तर करू देत.’ असं थेट टीका यावेळी पटोलेंनी केली.