मुंबई : गणेशोत्सवाचे आगमन होताच यंदाही पावसाने (Rain) हजेरी लावली असून गेल्या 4-5 दिवसांपासून उघडीप दिलेला वरुणराजा आज पुन्हा कोसळला आहे. मुंबईसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने मोठं नुकसान झालं असून लातूरमध्येही पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लातूर (Latur) जिल्ह्यात मागील सोळा तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दहापेक्षा अधिक मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. अरुंद आणि कमी उंचीच्या पुलांवरून पाणी वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही आज पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे, सकाळपासून सूर्यदेवाचे दर्शन दूर राहिला. लातूर जिल्ह्यातील 10 पेक्षा अधिक मार्गावर वाहतूक ठप्पा झाली असून बोरगावचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. येथील लेंडी नदीच्या पुलावरून पाणी जात असून गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे, तसेच शेतजमिनींचेही मोठे नुकसान झाले आहे.
उदगीर मुक्रमाबाद वाहतूक बंद, पुलावरुन पाणी
उदगीर मुक्रमाबाद रस्त्यावरील धडकनाळ या ठिकाणच्या अरुंद कठडे नसलेल्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी तो पूल बंद करण्यात आला आहे. मागील 16 तासापासून सातत्याने होत असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. शेत शिवारात पाणी, नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत,. तसेच, अनेक गावातील सखल भागात पाणी गेल्याने जनजीवन विस्कळीत झाला आहे. लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दहा अरुंद पुलावरून पाणीही जात असल्याने ते पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
भंडाऱ्यात 4 बकऱ्या मृत्यूमुखी, महिला जखमी
भंडाऱ्यात आज आलेल्या मुसळधार पावसानं एका घराची भिंत कोसळली. या घटनेत एक गाय आणि चार शेळ्यांचा (बकऱ्या) मृत्यू झाला. तर एका महिलेसह एक गाय गंभीर जखमी झाली. ही घटना भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील निलागोंदी या गावात घडली. गंभीर जखमी महिलेला तातडीनं साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं कोसळलेल्या भिंतीचा मलबा काढून मृत आणि जखमी जनावरांना त्यातून बाहेर काढून जखमी जनावरांवर उपचार करण्यात आले. वैशाली वंजारी (35) असं गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नावं आहे.
यवतमाळ जिल्ह्यात जोर'धार' पाऊस
आठ ते दहा दिवसांच्या उघाडीनंतर यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोर'धार' पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून ढगाळी वातावरण होते, तर अडीच वाजताच्या सुमारास अचानक जोरधार पावसाने हजेरी लावली. पडलेला पाऊस कपाशीसाठी काहीसा फायदाचा ठरत असला तरी सोयाबीन आणि तूर या पिकांना अतिपाण्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
मनोज जरांगे मुंबईकडे, ओबीसी नेते नागपुरात; आरक्षण आंदोलनावर CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
