मुंबई : पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. देशभरातून सर्वांनीच त्याचा निषेध केला. पण सर्वाधिक लक्ष वेधलं जातंय ते एका परदेशी नागरिकाच्या कृतीकडे. त्या परदेशी नागरिकाने भारतीय भूमिकेचे समर्थन करत दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेतली. विशेष म्हणजे, त्या नागरिकाने महाराष्ट्र राज्याचं भरभरून कौतुक करत 'महाराष्ट्र झिंदाबाद' अशी घोषणा (Maharashtra Zindabad) दिली. याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो ब्रिटनमधील असल्याचं सांगितलं जातंय.
'मी कधीही दहशतवादाला समर्थन दिलेले नाही. मी ज्या ठिकाणी राहतो त्या भारताशी आणि माझ्या महान महाराष्ट्र राज्याशी एकनिष्ठ आहे. महाराष्ट्र झिंदाबाद!' असं तो परदेशी नागरिक म्हणताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्याविरोधात भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानची सर्वबाजूंनी कोंडी करायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेला मोठा पाठिंबा मिळत आहे. ठिकठिकाणी भारताच्या समर्थनार्थ आंदोलनं केली जात आहेत. अशाच एका आंदोलनात एक परदेशी नागरिक भारताच्या भूमिकेचं समर्थन करताना दिसतोय.
समोर जमलेल्या अनेकांनी पाकिस्तानचे समर्थन करत पाकिस्तान जिंदाबादचा नारा लावला. पण हा पठ्ठा त्या सर्वांना पुरुन उरल्याचं दिसून आलं. हाती तिरंगा घेऊन हा एकटाच सर्वांना भिडला. मी ज्या ठिकाणी राहतोय त्या भारताशी आणि महाराष्ट्राशी एकनिष्ठ आहे. महाराष्ट्र हे एक महान राष्ट्र आहे असं म्हणत त्याने महाराष्ट्र जिंदाबाद अशी घोषणाबाजीही केली.
महाराष्ट्रासाठीच्या या भावना अगदी मनापासून...
या परदेशी नागरिकाने ज्या देशात तो राहतो, त्या भारताबद्दल आणि महाराष्ट्र राज्याबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने आणि अभिमानाने भावना व्यक्त केल्या आहेत. या परदेशी नागरिकाच्या भावना केवळ शब्दांत नव्हत्या, तर त्यातून प्रकट होत होती ती एक ओढ, भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी. एरवी देशाच्या बाहेरून येणाऱ्या प्रतिक्रिया राजकीय असू शकतात, पण ही भावना अगदी मनापासून आलेली.
महाराष्ट्र जिंदाबादच्या घोषणाबाजीमुळे भारतीय भावुक
या परदेशी नागरिकाने भारताला आणि महाराष्ट्राला दिलेल्या या समर्थनामुळे अनेक भारतीय नागरिक भावुक झाले आहेत. एका परदेशी नागरिकाकडून मिळालेला हा पाठिंबा महाराष्ट्रासह भारतासाठी गौरवाची बाब आहे. हे केवळ एक राजकीय वक्तव्य नव्हे, तर भारताच्या संस्कृतीविषयी, सहिष्णुतेविषयी आणि त्याच्या भूमीविषयी असलेल्या जिव्हाळ्याचा प्रत्यय देणारे वक्तव्य आहे.
महाराष्ट्राची जागतिक प्रतिमा उंचावणारे कृत्य
या परकीय नागरिकाने एकाच वाक्यात महाराष्ट्राचे खुलेपण, विविधतेतील एकता आणि संघर्षमय इतिहास यांचं विशेष कौतुक केल्याचं दिसतंय. या घोषणेबरोबरच त्याने भारत सरकारच्या दहशतवादविरोधी भूमिकेचेही समर्थन केलं आणि शांतता व मानवतेच्या बाजूने उभा राहण्याचा संदेश दिला. या परदेशी नागरिकाचे कृत्य म्हणजे भारताची, विशेषतः महाराष्ट्राची जागतिक प्रतिमा उंचावणारी गोष्ट आहे.
ही बातमी वाचा:
