कोल्हापूर : महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. हे निकष बदलावे आणि तातडीने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा कोल्हापुरातील दसरा चौकातून काढण्यात आला. यावेळी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.


राजू शेट्टी 2019 साली मिळालेल्या मदतीचा देखील यावेळी दाखला दिला. सरकार निर्णय नाही बदलला तर चिखलीतून नरसोबावाडीच्या दिशेने जाऊन जलसमाधी घेणार. जगण्यात काही अर्थ राहिला नाही, तोडगा नाही निघाला तर सामूहिक जलसमाधी नक्की आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 


मोर्चा काढणार म्हटल्यानंतर अनेकजण अस्वस्थ झाले. कुणी म्हटलं राजू शेट्टी बदलले, कुणी म्हटलं शेट्टी यांनी हवा बदलली. पण मी सांगतो एक महिना झाला पूर येऊन, एकालाही तातडीची मदत मिळालेली नाही. एक महिना झाला अजून मदतीचा पत्ता नाही. गेली 25 वर्षे चळवळीत काम करतो, 4 पूर बघितले. प्रत्येक वेळी तातडीची मदत केली, मग यावेळी काय झाले. 2019 चा पूर याहून मोठा होता. मात्र तुम्ही आमच्या अपेक्षा भंग केला आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं. 


उपमुख्यमंत्र्यांना लाज नाही वाटत का? 


उपमुख्यमंत्री अजित पवार पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना तुमची घरं सरकारच्या ताब्यात द्या, आणि मगच पुनर्वसन करता येईल, असे म्हणाले होते. इतक्या वर्ष राहिलेली घरं लोक कशी काय यांच्या ताब्यात देतील? असं बोलताना यांना लाज वाटत नाही का? त्यापेक्षा आम्हाला पावसाळा आला की तात्पुरता निवारा करून द्या, अशी मागणी यावेळी राजू शेट्टी यांनी केली.


मुश्रीफ साहेब आमच्या नादाला लागू नका तुम्हाला ते महाग पडेल


ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणत आहेत ही राजू शेट्टी यांची दिशा बदलली आहे. याला उत्तर देताना राजू शेट्टी म्हणाले की, मुश्रीफ साहेब या सत्तेचे तुम्ही एकटेच लाभार्थी आहात बाकी सगळे सतरंजी उचलण्यासाठी आहेत. आमच्या नादाला लागू नका तुम्हाला ते महाग पडेल.. कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त केला होता तो यासाठीच केला होता का? असा सवाल देखील यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे.