नागपूर : कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 'पद्मविभूषण'ने सन्मान व्हावा, म्हणून सरकार दरबारी दिलेली फाईल गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत आपली व्यथा मांडली. खाशाबा जाधव यांना पद्मविभूषण मिळावं, म्हणून पावसाळी अधिवेशनात त्यांच्या कुटुंबीयांनी क्रीडा मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी तावडेंनी आश्वासन दिल्याचं रणजीत जाधवांनी सांगितलं.

पुरस्कार मिळण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं, पण ती प्रक्रिया करण्यात आली नाही. जाधव कुटुंबीयांनी याबाबत क्रीडा विभागाला विचारणा केली असता, ती फाईल गहाळ झाल्याची माहिती मिळाली.

हे प्रकरण भाजप खासदार रामदास तडस यांना समजल्यानंतर त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी पंतप्रधानांकडे पद्मविभूषण पुरस्कारासाठी त्वरित शिफारस करणार असल्याचं आश्वासन दिलं.

कोण आहेत खाशाबा जाधव?

खाशाबा जाधव हे कुस्तीगीर होते. 1952 साली हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकलेलं कांस्यपदक हे भारताला स्वातंत्र्योत्तर काळात मिळालेलं पहिलं वैयक्तिक पदक होतं. 1948 मध्ये लंडन ऑलिंपिकमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता. भारत सरकारने पद्म पुरस्काराने सन्मानित न केलेले ते एकमेव ऑलिंपिक पदक विजेते असल्याची माहिती आहे.

खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातल्या गोळेश्वर गावात एका मराठमोळ्या कुटुंबात झाला. 2001 मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.