अहमदनगर : देशाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या हिरे व्यापारी नीरव मोदीला अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी दणका दिला आहे. कर्जत तालुक्यातील नीरव मोदीच्या जमिनीवर शेतकऱ्यांनी कब्जा केला आहे. 125 एकर जमीन शेतकऱ्यांनी पुन्हा ताब्यात घेतली आहे.


काळी आई मुक्ती संग्रामचा नारा देत घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी जमिनीवर कब्जा मिळवला. खंडाळा गावातील जमीनवर शेतकऱ्यांनी कब्जा केला. काही राजकीय व्यक्तींच्या मदतीनं शेतकऱ्यांनी जमीन ताब्यात घेतली आहे.

जमीन ट्रॅक्टरनं नांगरुन उद्या शेती कसण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. अत्यंत कवडीमोल भावानं शेती घेतल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या. या जागेवर फायरस्टोन स्टोन कंपनीच्या नावाचा उर्जा प्रकल्प आहे.

नीरव मोदीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचं उघड झाल्यावर अंमलबजावणी संचालनालयानं त्याच्या संपत्तीवर टाच आणली. यावेळी ईडीनं त्याच्या खंडाळ्याची जमीन सील केली. तेव्हापासून या जमिनीवर ईडीचा ताबा आहे. मात्र इथला ऊर्जा प्रकल्प सुरुच आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही. तोपर्यंत या जमीनीवर अंमलबजावणी संचालनालयाची कब्जा राहणार आहे.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घेतलेला ताबा हा अवैध असल्याचं जाणकरांचं मत आहे. ही जमीन मोदी यांनी थेट न घेता मध्यस्थीच्या माध्यमातून खरेदी केली आहे. या व्यवहाराचे शेतकऱ्यांना पैसे ही अदा करण्यात आले आहेत. तरीही शेतकऱ्यांनी ताबा घेतल्यानं नियमबाह्य असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे या प्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालयाच्या भूमिकेकडं लक्ष लागलं आहे.