पहिल्यांदाच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संपाचा इशारा
एबीपी माझा वेब टीम | 29 Mar 2017 05:04 PM (IST)
प्रातिनिधिक फोटो
अहमदनगर : शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. शेतकऱ्यांनी येत्या 1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी गावोगावी बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे. शेतमालाला योग्य भाव द्या अन्यथा शेतमाल विकणार नाही आणि पिकवणारही नाही अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. शेतीमध्ये घाम गाळूनही त्याचा मोबदला मिळत नसल्यानं 1 जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत. यासाठी विशेष ग्रामसभा घेत संपाचा ठराव शेतकऱ्यांनी केला आहे. नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी 3 एप्रिलला शेतकरी पुणतांब्यामध्ये दाखल होणार आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहनही करण्यात येत आहे.