Chhatrapati Sambhaji Nagar News: छ. संभाजीनगरात घडलेल्या राड्याची इनसाईड स्टोरी 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे.  घटनेची एसआयडीने आधीच सूचना दिली होती. नामांतर आणि हिंदू मोर्चामुळे शहरात अस्वस्थता पसरल्याचा अहवाल एसआयडीने दिला होता. राज्य गुप्त वार्ता विभागाचा हा अहवाल आहे.  


मिळालेल्या माहितीनुसार, ज्या परिसरात राडा झाला, त्या परिसराचा उल्लेख एसआयडीच्या अहवालात आधीच करण्यात आला होता. संभाजीनगर पोलिसांना याची सविस्तर माहिती देण्यात आली होती. या माहितीत असं सांगण्यात आलं होतं की, या परिसरात अधिक दक्षता ठेवण्याची गरज आहे. पोलिसांकडून जास्त बंदोबस्त लावण्याची गरज आहे. कारण या भागात नामांतरानंतर आणि हिंदू जनजागृती मोर्चा निघाला होता, त्यानंतर जास्त अस्वस्थता आहे. म्हणून येथे जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं अहवालात सांगण्यात आलं होतं. त्यानुसार काही बंदोबस्त देखील पोलिसांकडून या ठिकाणी ठेवण्यात आला होता. मात्र तो पुरेसा नव्हता, हे आता तपासानंतर समोर येत आहे. याचसोबत ज्यावेळी राडा झाला, त्यावेळी पोलिसांचा जो प्रतिसाद होता, तो योग्य नव्हता किंवा तो कमी पडला. वेळेवर योग्य पावले उचली गेली असती किंवा अतिरिक्त पोलीस तिथे पाठवले गेले असते, तर ही घटना नियंत्रित करण्यात पोलिसांना यश मिळालं असतं. तसेच अशी घटना  घडली नसती, असं ही म्हटलं जात आहे. 


काय आहे वाद घडायचं मुख्य कारण?


ज्या अनुषंगाने या घटनेचा तपास केला गेला आहे, त्यात ही वाद घडायचं मुख्य कारण त्यात म्हणजे नामांतर आणि हिंदू जनजागृती मोर्चा असल्याचं सांगितलं जात आहे. यात जे नामांतर विरोधी लोक होते. त्यांच्यात एक राग होता आणि त्यांनी काही बैठका घेतल्या होत्या. ज्यात आपण शांत राहायचं नाही, आपण उत्तर द्यायचं, अशा प्रकारची भावना होती. या बैठकीची माहिती एसआयडीला मिळाली होती. त्या अनुषंगाने जर कुठे काही लहान घटनाही घडली, तर ती मोठी होऊ शकते.  म्हणूनच यावर जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे, असं अहवालात सांगण्यात आलं होतं. यातच नामांतर समर्थक आणि याच्या विरोधात जे होते, त्यांच्यातील अशांततेमुळे हा राडा झाला असावा, असं बोललं जात आहे.