राज्यात विजेची मागणी साडे सतरा हजार मेगावॅट असताना प्रत्यक्षात सोळा ते साडे सोळा हजार मेगावॅट वीज उपलब्ध होते. यासह वीज गळतीचं प्रमाण, वीज बिलं थकवणाऱ्यांची संख्या या सर्व कारणांमुळे राज्यात सध्या तातडीचं भारनियमन लागू करण्यात आलं.
बी ग्रुपपर्यंत हे भारनियमन सुरु झालं आहे. किमान तीन ते साडेचार तासांचं हे भारनियमन वेगवेगळ्या वेळेत होत आहे. ए आणि बी ग्रुप म्हणजे या ग्रुपमधील वीज ग्राहक हे नियमित वीज बिलं भरणारी आणि वीज गळतीचं प्रमाण जवळपास नसलेली आहेत. तर सी आणि डी ग्रुपमधील ग्राहक वीज बिल नियमित न भरणारी आणि वीज गळतीचं प्रमाण अधिक असणारी आहेत.
राज्यात सध्या कृषी वीज बिलं थकीत आकडेवारी 20 हजार कोटींच्या घरात आहे . राज्यात 40 लाख कृषी वीज पंप आहेत. या सर्व कारणांमुळे महावितरणने भारनियमनाचा निर्णय घेतला आहे. मात्र ऐन ऑक्टोबर हिटमध्ये हा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.