Eknath Shinde on Sangli Accident:  दोन दिवसांपूर्वी मिरज-पंढरपूर मार्गावर नागजजवळ पायी चालत जाणाऱ्या दिंडीत एक चारचाकी वाहन घुसल्याने झालेल्या अपघातात 14 हून अधिक वारकरी जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या वारकऱ्यांना मिरज मधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान या सर्व वारकऱ्यांच्या तब्येतीची आणि त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांची स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली आहे. सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत.


तसेच ज्या वारकऱ्यांना गंभीर दुखापत झालीय या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शवली असून याबाबतची कल्पना मुख्यमंत्री शिंदे यांनी  मिरजमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे  जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांच्याशी फोनवरुन बोलताना दिली आहे.


आषाढी वारी अगदी 4 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना मिरज-पंढरपूर मार्गावर नागज जवळील केरेवाडी फाट्याजवळ आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका वारकऱ्यांच्या दिंडीत जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले होते.


जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली.
 
या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. आषाढी वारी अगदी 2-3 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पंढरपूरकडे जात असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे काही जखमी वारकऱ्यांची यंदा वारी मात्र चुकणार आहे.