मुंबई : टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाहीत, यासाठी शासन काळजी घेणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. टोलनाक्यांवर असलेला पिवळा पट्टयाचा नियम कठोरपणे अंमलात आणला जाईल, अशी ग्वाही शिंदेंनी विधानपरिषदेत दिली.


महाराष्ट्रात प्रत्येक टोलनाक्यावर पाच जणांची नियुक्ती केली जाणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेमध्ये केली.

विधानपरिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला राज्यातील टोलनाक्यांवरच्या पिवळा पट्ट्याचा मुद्दा भाई गिरकर यांनी उपस्थित केला. विशेषतः मुंबईच्या टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागत असल्याचा मुद्दा गिरकर यांनी मांडला.

टोल नाक्याजवळ असलेल्या पिवळा पट्ट्याच्या बाहेर वाहने उभी असतील, तर त्या वाहनांना टोलमधून सूट दिली जाते, नियमाने टोल घेता येत नाही. मात्र या नियमाबद्दल लोकांना माहिती नसल्यानं टोलधारक वाहनांकडून पैसे वसूल करतात.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या टोलनाक्यांवर पिवळ्या पट्ट्याच्या नियमाची अंमलबजावणी केली जाईल, यासाठी एक दक्षता पथकही नेमले जाणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

काही टोल नाक्यांवर टोलवसुली मुदत संपल्यानंतरही सुरु असल्याचा मुद्दा आमदार प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला. तेव्हा याबाबात एक समिती नेमत महिनाभरात टोलनाक्याच्या वसुलीच्या सद्यस्थितीबाबात अहवाल देणार असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं.