विशेष म्हणजे मोहन प्रकाश, पृथ्वीराज चव्हाण आणि एकनाथ खडसे या तिघांनी विमानातूनही दिल्लीपर्यंत एकत्रित प्रवास केला. मोहन प्रकाश हे काँग्रेसचे राज्य प्रभारी आहेत. त्यामुळे त्यांची खडसेंशी भेट झाल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले आहे.
तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप कळू शकलेले नाही.
एकनाथ खडसे यांनी दिल्लीतही अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. विशेषत: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन खडसेंनी आपली नाराजीही व्यक्त केल्याचं कळतं आहे.
भोसरी जमीन प्रकरणानंतर मंत्रिपदावरुन हटवल्यानंतर एकनाथ खडसेंनी नेहमीच जाहीर व्यासपीठावरुन नाराजी व्यक्त केली आहे. त्यात गेल्या काही दिवसात तर त्यांना काँग्रेसमधूनही पक्षात येण्याच्या जाहीररित्या ऑफर दिल्या गेल्या. या सर्व पार्श्वभूमीवर खडसे आणि मोहन प्रकाश यांची भेट झाल्याने चर्चेला एकप्रकारे प्रोत्साहन मिळाले आहे.
काँग्रेस प्रवेशाच्या बातमीचं खंडन
काँग्रेस प्रवेशाच्या बातमीचं एकनाथ खडसे यांनी खंडन केलं आहे. “औरंगाबादमधून मोहन प्रकाश आणि पृथ्वीराज चव्हाणांबरोबर विमान प्रवास केला, हे खरं आहे. दिल्लीत नितीन गडकरींची भेट शहाद्यातल्या साखर कारखान्याच्या एका प्रकल्पाच्या उद्घाटनाचे आमंत्रण देण्यासाठी घेतली.”, असेही खडसे यांनी सांगितले.