Devendra Fadnavis :महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ताप असतानाही लातूर दौरा केलाय. शनिवारी सकाळपासूनच देवेंद्र फडणवीस यांची तब्येत बिघडली होती. तरीही त्यांनी लातूर दौरा पूर्ण केला. पण लातूरचा दौरा झाल्यानंतर सोलापूरचा दौरा करण्याऐवजी हैदराबाद मार्गे मुंबईला जाणे पसंत केलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारपासून ताप येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना 102 ताप होता. तरीही त्यांनी शुक्रवारी मुंबईत कार्यक्रम केले. त्यानंतर सकाळी ते लातूर दौऱ्यावर गेले. सकाळपासून ताप असताना ही देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमध्येही अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. आवसा येथील रस्त्यांचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम झाल्यानंतर मात्र त्यांनी पुढील सोलापूर दौरा रद्द केला. तेथून ते हैदराबादला गेले तिथून विमानाने मुंबईकडे जाणार आहेत. काळजी करण्यासारखी स्थिती नाही अंगात ताप असल्याकारणाने पुढील दौरा करणे शक्य नसल्यामुळे फडणवीस यांनी मुंबईकड़े जाण्याचा निर्णय घेतला आहे ...अशी माहिती औसाचे आमदार अभिमन्यु पवार यांनी दिली आहे.
दरम्यान, आमदार रमेशअप्पा कराड यांच्या संवाद जनसंपर्क कार्यालयाचे आज सकाळी लातूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन झाले. केंद्रीय मंत्री श्री. भगवंत खुबा जी, खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यू पवार यावेळी उपस्थित होते. शेतकर्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देत त्यांचे जीवन सुखकारक आणि समृद्ध करणे, हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते. असा प्रयत्न भाजपाचे लोकप्रतिनिधी करताहेत, याचा मला अतिशय आनंद आहे. सेवा आणि समर्पण हाच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला दिलेला मंत्र आहे, असे फडणवीस म्हणाले.
